निघोज, पुढारी वृत्तसेवा: निघोज परिसरातील कुंड रस्त्यानजीक मुंबईचे व्यवसायिक राजू रामचंद्र वराळ यांच्या बंगल्यातील चोरीचा तपास करण्यासाठी सहा दिवसानंतर पोलिस सतर्क झाले. रविवारी (दि.18) पोलिस कर्मचारी डहाळे व त्यांच्या सहकार्यांनी वराळ यांच्या बंगल्यावर जाऊन चर्चा करत पोलिस यंत्रणा कामाला लावल्याची माहिती वराळ यांना देण्यात आली.
याबाबत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ यांनी चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली. वराळ यांचा बंगल्याच्या गच्चीवरून खाली उतरून आतील दरवाजे तोडून दोन टीव्ही संच, देवघरातील पितळी मूर्ती चोरून नेल्या आहेत. त्यांची शेती करणारा महारूद्र ताठे यांच्या बंगल्यामागे असणार्या खोलीचा दरवाजा तोडून पाच हजार रुपयांची चोरी केली. वराळ यांचा दिड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. वराळ यांचे कुटुंबीय मुंबईत आहे. बंगला बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरी केली.