ढोरजळगाव; पुढारी वृत्तसेवा : वेळेवर बस येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची दखल घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस न सोडल्यास विद्यार्थ्यांसह रास्ता रोको आंदोलनाचा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला. ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये परिसरातील माका, निंबेनांदूर, मळेगाव, आखतवाडे, आपेगाव येथून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.
सकाळी 7.30 ते 12.30 आणि 12.30 ते 5 अशा दोन सत्रांमध्ये शाळा भरते. सकाळी शाळेमध्ये येण्यासाठी एकच बस आहे. प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने दाटीवाटीने, उभ्यानेच विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. शाळा सुटल्यानंतर दुपारी उन्हामध्ये विद्यार्थी उपाशीपोटी बसची तासन्तास वाट पाहत उभे राहतात. स्टॅण्डवर थांबलेल्या मुलींना काही टारगटांच्या छेडछाडीला सामोरे जावे लागते. बस उशिरा आल्याने रानात राहणार्या मुलींना घरी जाण्यास उशीर होतो.
सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर संध्याकाळपर्यंत बस येत नाही. लहान लहान मुले बसची वाट पहात अंधार पडतो. अशा वेळी पालकांना मुलांना घ्यायला यावे लागते. शेवगाव आगार व्यवस्थापनाला याची वारंवार तोंडी, लेखी कल्पना देऊनही वेळेवर सोडल्या जात नाहीत. यामुळे संतप्त पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थांच्या शालेय वेळेमध्ये तातडीने वेळेवर बस न सोडल्यास 1 मार्चला ढोरजळगाव येथे विद्यार्थ्यांसह रास्ता रोको आंदोलन, 11 मार्चपासून शेवगाव अगारासमोर उपोषण करण्याचा इशारा पालक, ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर सागर देशमुख, अजय साबळे, किरण हांबर, बाळासाहेब खवले, कैलास पाटेकर, सोमनाथ पाटेकर, ओम रासने, श्रीकृष्ण उकिर्डे, सुनील खोसे, साक्षी वाकडे, दिव्या बुधवंत, पूनम निकम, वैष्णवी राशीनकर, श्रद्धा चाहुर, जयश्री शेळके आदींसह सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या सह्या आहेत.
तिसगावमार्गे 15 मिनिटाला नगरसाठी बस आहे. मिरीमार्गे मात्र प्रवासी व उत्पन्न नसल्याचे कारण आगार व्यवस्थापन देतात. प्रवासी व विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. याची तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल.
– सागर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते