संगमनेर शहर; पुढारी वृत्तसेवा : जागेच्या वादातून मारहाण झालेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा उपचार सुरू असताना लोणी येथे रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या मृत्युस जबाबदार असणार्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मृताच्या संतप्त नातेवाईकांनी केली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यातून हलविणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. तालुक्यातील घुलेवाडी येथे म्हसोबानगर परिसरातील पोपटराव दादाभाऊ निकम यांना (दि.4) फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7ः30 वाजेच्या सुमारास जागेच्या वादातून काही जणांनी मारहाण केली. त्यांचा रक्तदाब कमी झाला.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना लोणी येथे रुग्णालयात हलविले होते. ते कोमात होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यामुळे मृताचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन थेट संगमनेर शहर पोलिस गाठले. मारहाण करणांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह येथेच ठेवू, अशी भूमिका घेतली. पोलिस अधिकार्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मृत निकम यांचा मुलगा विक्रम यांनी 20 फेब्रुवारी शहर पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. आपल्या नावे इंदिरा आवास घरकुल योजनेत 2011 ते 2012 ला संडास बाथरूम मिळाले होते. घरी नसताना सूचना न देता सीताराम राऊत, राजू यादव खरात, सुनील दगडू रोकडे, अविनाश कारभारी विधाटे, अनिल काटे, अनिकेत अशोक माघाडे, नवनाथ कारभारी विधाटे, राहुल शिवाजी मुंतोडे, आकाश सुरेश साळवे, राहुल संभाजी रोकडे, अनिकेत नवनाथ ठोंबरे, संतोष यादव खरात, मयूर अभिमन्यू राखपसरे, विठ्ठल दिलीप खरात, उज्ज्वला नवनाथ डोंगरे, अलका अशोक माघाडे, शोभा सुनील रोकडे, नंदा संभाजी रोकडे, सुजाता विजय खरात यांनी बांधकाम पाडून पुरावा नष्ट केला, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.
ही मंडळी दहशत निर्माण करीत आहे. त्यांना राजकीय पाठबळ आहे. ते त्रास देतात. जागा हडप करण्यासाठी त्यांनी वडील पोपटराव निकम यांना 4 फेब्रुवारी मारहाण केली होती. या लोकांपासून धोका आहे. आम्हाला घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशी मागणी तक्रार अर्जाद्रारे करण्यात आली होती. या तक्रार अर्जामुळे पोलिस कारवाईकडे लक्ष लागले आहे.
लेखी आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात
पोलिस निरीक्षक आल्यानंतर गुन्हा दाखल होईल, पोलिस अधिकार्यांनी सांगितले. यानंतर रुग्णवाहिका पोलिस ठाणे आवारातून बाहेर नेली, मात्र काही वेळेनंतर पुन्हा मृतदेह पोलिस ठाण्या आवारात आणला. अधिकार्यांनी चर्चा केली. अंत्यविधीनंतर या, अशा लेखी आश्वासनानंतर मृतदेह घुलेवाडी येथे नेण्यात आला.