शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : जिरायती भागाला पाणी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण झाल्याने आज मोठे समाधान मला आहे. गेली अनेक वर्षे जिरायती भागातील शेतकर्यांनी केलेल्या संघर्षाला आता यश आले आहे. कालव्यांव्दारे आलेले पाणी लवकरच शेतकर्यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. निळवंडे लाभक्षेत्रातील खडकेवाके, खडेकेवाके, देहेगांव, पिंपळस, आडगाव, मिरपूर, लोहारे या गावांमधील सोळा बंधारे आणि सहा पाझर तलावांमध्ये पाणी पोहोचल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते सारंगधर मुरादे, सोसायटीचे चेअरमन रावसाहेब लावरे, जालिंदर मुरादे, सरपंच संगिता मुरादे, उपसरपंच हिराबाई मुरादे तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, वर्षानुवर्षे निळवंडेच्या पाण्यासाठी अनेक शेतकर्यांनी संघर्ष केला. या गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव लावरे यांचा उल्लेख करुन पाण्यासाठी संघर्ष करणारा योध्दा म्हणून त्यांनी काम केले. आज या भागात आलेले पाणी पाहण्यासाठी ते आपल्यामध्ये पाहीजे होते. परंतू या सर्वांच्या प्रयत्न आणि संघर्षामुळेच जिरायती भागाला पाणी मिळू शकले. आज कालव्यांव्दारे पाणी या भागात आले असले तरी, भविष्यात आपल्याला ते शेतकर्यांच्या बांधापर्यंत घेवून जायचे आहे. यासाठी आता वेगाने काम सुरु करावे लागणार असून, सरकार यासाठी निधीची उपलब्धता करुन देण्यात कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नागरिक उपस्थित होते.
उजव्या कालव्याची लवकरच चाचणी
उजव्या कालव्याची चाचणी लवकरच पुर्ण करुन, उजव्या कालव्यातही पाणी सोडण्याचे नियोजन विभागाने पुर्ण केले असून, त्या भागातील शेतकर्यांनाही पाणी देण्याचा शब्द आपण पुर्ण करणार असल्याची ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.