पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी अधिकार्‍यांना धरले धारेवर.!

पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी अधिकार्‍यांना धरले धारेवर.!

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन अंतर्गत बहुतांश गावांमध्ये विश्वासात न घेताच योजनेचे काम सुरु असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. ही अतिशय गंभीर बाब असल्याने याबाबत त्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फटकारले. ठेकेदारांच्या भरोशावर योजनेची अंमबजावणी तुम्ही करणार का, असा सवाल महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी अधिकार्‍यांना केला.
राहाता, श्रीरामपूर, संगमनेर व राहुरी तालुक्यात सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा आढावा मंत्री विखे पा. यांनी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत घेतला. यावेळी ते बोलत होते.

जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा अधिकार आहे. या योजनेच्या कामाची पूर्तता करताना नागरीकांना विश्वासात घ्या. ग्रामस्थांच्या सुचनांप्रमाणे योजनेच्या आराखड्यात पुन्हा बदल करा. योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकार्‍यांनीसुध्दा जबाबदारीने काम करावे, अशा सूचना देत, केवळ ठेकेदारांच्या भरोशावर योजनेची अंमलबजावणी करु नका. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कामाच्या ठिकाणी अचानक भेटी देवून वस्तुस्थिती तपासावी, असे स्पष्ट निर्देश मंत्री विखे पा. यांनी दिले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जि. प. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सोनवणे, सर्व विभागांचे प्रांताधिकारी, तहसीलदार व संस्थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पा. यांनी सर्व तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा गावनिहाय आढावा घेतला. गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत तक्रारी जाणून घेत त्यांनी अधिकार्‍यांना तातडीने त्या सोडविण्याबाबत आदेश दिले.

योजनेची अंमलबजावणी करताना अनेक गावांमध्ये ग्रामसभा झाल्या नाहीत. काही गावांमध्ये ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार योजनेत कोणताही अंतर्भाव झाला नाही. यामध्ये बदल करुन, अधिकार्‍यांनी पुन्हा ग्रामस्थांच्या मागणीनुसार योजनांचे आराखडे तयार करावेत. मागणीप्रमाणे योजनेचा वाढीव प्रस्ताव असल्यास पुन्हा मंजुरीसाठी पाठवा, अशा सुचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या.

सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समिती व जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी एकत्र समन्वय ठेवावा. या योजनेच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामे सुरु असलेल्या गावांमध्ये अचानक भेटी देवून कामांचा आढावा घ्यावा, अशा सुचना पालक मंत्री विखे पा. यांनी केल्या.

ठराविक कंपनीचेच पाईप वापरण्याची सक्ती नाही

योजनेमध्ये वापरण्यात येणार्‍या पाईप बाबत बैठकीत तक्रारी करण्यात आल्या. एका ठरावीक कंपनीचेच पाईप वापरावे, अशी सक्ती योजनेत कुठेही नाही, असे स्पष्ट करुन, पालक राधाकृष्ण मंत्री विखे पा. म्हणाले, योजनेबाबत कुठलाही निर्णय करताना अधिकारी व कंत्राटदारांनी ग्रामस्थांना विश्वात घेवून करावा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news