नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज (दि. 13) रोजी पार पडणार असून, नगर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून वातावरणातील तापमान कमी झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगर दक्षिण मतदारसंघात आज (सोमवारी) मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आल्याचे दिसून येते. तालुक्यातील 110 गावांमध्ये मतदान पार पडणार आहे. वाढत्या तापमानाचा फटका पहिल्या तीन टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर दिसून आला होता. नगर तालुका दुष्काळाशी लढा देत असून त्याचा परिणाम मतदानावर होणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग, प्रशासन व सामाजिक संस्थांकडून प्रयत्न करण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे तालुक्यात तापमान कमी झाले असून त्याचा परिणाम मतदानावर होणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. मतदानाच्या टक्केवारीचा आकडा वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगर तालुक्यात अनेक गावांनी दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने त्याचाही परिणाम प्रचारादरम्यान दिसून आला. मतदानासाठी ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच सर्वसाधारण मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर रविवारी दुपारीच सर्व कर्मचारी व साहित्य हजर झाले आहे. मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी झाली असून मतदान सुरळीत पार पडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. संवेदनशील समजल्या जाणार्या मतदान केंद्रासाठी जास्त बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचाराचा धुराळा उडाला होता. आरोप-प्रत्यारोपाने ढवळून निघालेल्या तालुक्यामधुन मतदार कोणाला कौल देणार याचा फैसला चार जून रोजी होणार्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. एकंदरीत नगर तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामाजिक संस्थांकडून जनजागृती ही करण्यात आली. त्याचा मतदानावर किती परिणाम होतो, हे मतदानाच्या आकडेवारीनंतरच स्पष्ट होणार आहे
हेही वाचा