नगर : पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे जवळपास सर्व पंचनामे झालेले आहेत. अशा परिस्थित देखील कोणाचे पंचनामे राहिले असल्यास संबंधित बाधित शेतकर्यांनी त्वरित तहसीलदार यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने 2 लाख 2 हजार236 शेतकर्यांच्या 1 लाख 21 हजार 628 हेक्टर तर सततच्या पावसाने 2 लाख 98 हजार 717 शेतकर्यांच्या 1 लाख 84 हजार 135 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व बाधित शेतपिकांचे पंचनामे झालेले आहेत. या महिन्यात एकूण 3 लाख 5 हजार 764 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना तडाखा बसला. त्यामुळे लाखो शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. या बाधित शेतकर्यांना शासनाच्या नियमानुसार अनुदान देण्यासाठी तब्बल 590 कोटी 21 लाख रुपयांचा निधी लागणार आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत एकूण 4 लाख 41 हजार 121 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांच्या नुकसानीचा संयुक्त अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप काही क्षेत्राचे वा गावांचे पंचनामे झालेले नाहीत, अशी माहिती असल्यास लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाला द्यावी. जेणेकरुन सुधारित अनुदान मागणी करण्यात येईल,असे आवाहन देखील त्यांनी केले.