![श्रीरामपूर : अतिवृष्टीच्या नुकसान यादीतून नावे वगळली](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2Ffarmer-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यशासनाने नुकतेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक भरपाईची यादी प्रसिध्द केलेली आहे. यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकर्यांचे नावे वगळण्यात आल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सन 2022-23 साली राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यालाही याचा मोठा फटका बसला होता. या पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला होता. याबाबत शेतकर्यांनी पिकांची झालेल्या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, यासाठी जोरदार मागणी केली होती.
यानंतर शासनाने 2022-23 झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करून स्थानिक तहसीलदारांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु यावेळी संबंधित अधिकार्यांनी व्यवस्थीत पंचनामे न केल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत अनेक गावातील शेतकर्यांची नावे वगळण्यात आल्याचे दिसत आहे. एकाच गावात सारखाच पाऊस पडला असतानाही त्याच गावातील काही शेतकर्यांनी नावे यादीत आली तर काही जणांना वगळण्यात आले आहे. शासनाच्या या दुटप्पी भुमिकेचा शेतकर्यांनी निषेध केलेला आहे.
संबंधीत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश शेडगे, भागीनाथ जाधव, श्रीराम त्रिवेदी, भगवान लोंढे, आकाश जाधव, उमेश लबडे, इलियाज पठाण, शुभम दुधाळ, प्रकाश जाधव, मधूकर काकड, बाळासाहेब घोगरे, बॉबी बकाल, जितेंद्र शहा यांंनी केलेली आहे.
अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई यादीतून वगळण्यात आलेल्या शेतकर्यांची नावे समाविष्ट करावीत. तसेच अतिवृष्टी आणि पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम 14 ऑगस्टपर्यंत संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी, अन्यथा येत्या 15 ऑगस्टपासून संबंधीत शेतकरी उपोषणास बसणार असल्याचा इशारा, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश शेडगे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिलेला आहे.