नगर; पुढारी वृत्तसेवा : कापड बाजारात व्यापार्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिका अतिक्रमण विभागाने ठोस पावले उचलत पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आणि रविवारी सकाळपासून मुख्य बाजारातील अतिक्रमणे हटविली.
कापड बाजारात दोन दिवसांपूर्वी व्यापार्यावर खुनी हल्ला झाला. त्यानंतर व्यापार्यांनी बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. त्यावर महापालिकेेने तत्काळ अतिक्रमणे हटविण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार शनिवारी रात्री व रविवारी सकाळपासून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. भिंगारवाला चौक, एमजी रोड ते तेलीखुंटापर्यंत, शहाजी रोड ते नवी पेठेपर्यंत अतिक्रमणे हटविली. तसेच मोची गल्ली, गंजबाजारातील अतिक्रमणेही काढली. त्यात हातगाड्या, फ्लेक्स बोर्ड, ताडपत्री, पत्र्याचे शेड, प्लॅस्टिक असे दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्यासह महापालिकेच्या पथकाने केली.