श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : दौंड-मनमाड पर्यंत सर्व्हे झालेल्या प्रलंबित रेल्वे मार्गाच्या कामास गती देण्यासाठी मराठवाड्याप्रमाणे निधी देवून रेल्वे मार्ग करावे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रणजित श्रीगोड यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मध्य रेल्वेच्या दौंड-मनमाड रेल्वे मार्ग दुहेरी करणाचे काम सुरु आहे. या मार्गावर पूर्वी सर्व्हे झालेले प्रस्तावित असलेल्या कल्याण, मुरबाड, अ. नगर, पुणे, नगर , औरंगाबाद, नगर- करमाळा (जेऊर रेल्वे स्थानक) व बेलापूर-परळी, साईनगर शनिशिंगणापूर व पुणतांबा रोटेगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामास गती देण्यासाठी त्वरित निधी द्यावा, अशी मागणी रेल्वे राज्य मंत्र्यांकडे श्रीगोड यांनी केली आहे.
रेल्वेत दौंड-मनमाड मार्गावर ऐतिहासिक रेल्वे स्थानकांमध्ये शिर्डी, नगर व बेलापूर स्टेशनचा समावेश करावा. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास तिकीट दर सवलत करोना काळात बंद होती. ती पूर्ववत सुरु करा, अशी मागणी बजेटपूर्वी केली असताना बजेटमध्ये कोणतीही तरतूद न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत ही सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी श्रीगोड यांनी केली आहे. ग्रामीण भागात पूर्वी पॅसेंजर गाड्या धावत होत्या. कोरोनापासून या रेल्वे बंद आहेत. प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे मंत्र्यांची शिष्टमंडळ व लोकप्रतिनिधीद्वारे मागण्यांसाठी भेट घेणार असल्याचे श्रीगोड म्हणाले.