

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी मतदार संघातील बाभुळगाव येथे 18 कोटी 70 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्याने सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला होता. आ. तनपुरे यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करीत चार महिने उलटूनही शेतकर्यांना सौर प्रकल्पाची वीज मिळत नसल्याचे सांगताच शिंदे-फडणवीस शासन जागे झाले. सकाळीच सौर उर्जेतून वीज पुरवठा सुरू झाल्याचे समजताच सबस्टेशन स्थळी जमा झालेल्या शेतकर्यांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.
राहुरी तालुक्यातील बाभूळगाव, मुळानगर, धामोरी खुर्द, धामोरी बु. वरवंडी या गावातील शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर उर्जा सबस्टेशनची निर्मिती करण्यात आमदार तनपुरेंना मोठे यश मिळाले. महाविकास आघाडी शासन काळात उर्जा खात्याचे उर्जा राज्यमंत्री असताना आ. तनपुरे यांनी महावितरण मार्फत कोट्यवधीची विकासकामे केली.
राहुरी हद्दीतील शेतकरी व सर्वसामान्यांचे उर्जा विषयक प्रश्न सोडविताना बाभूळगाव, वांबोरी, शिरापूर (पाथर्डी) व आरडगाव येथे सौर प्रकल्प मंजूर केले. बाभूळगाव येथील सौर प्रकल्पातून चार महिन्यापूर्वीच उर्जा निर्मिती सुरू झाली. 25 हजार यूनिट वीज निर्मिती होत असताना शेतकर्यांना लाभ मिळत नव्हता. परंतु आ. तनपुरे यांच्या पाठपुराव्याने सौर उर्जेतून वीज
पुरवठा सुरू झाल्याने शेतकर्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब वाघमारे, त्रिंबक अडसूरे, ह.भ.प.सेवा संस्था संचालक पंढरीनाथ पाटोळे, मुळा प्रवरेचे माजी संचालक अय्युब पठाण, मुळानगरचे उपसरपंच सलीम शेख, जालिंदर अडसूरे, अन्सार पठाण, रशिद शेख, बाबासाहेब सोनवणे, हरिभाऊ पाटोळे, बाबासाहेब ससाणे, कैलास माने, केशव चितळकर, अनिल वाघमारे, अक्षय वाघमारे, रामदास माने, अंकूश अडसूरे, सोपानराव थोरात आदींनी सौर उर्जा प्रकल्पस्थळी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
आम्हा शेतकर्यांच्या घरी दिवाळी : वाघमारे
शेतकरी आबासाहेब रामभाऊ वाघमारे यांनी सांगितले की, आमदार तनपुरे यांच्याकडे अनेक वर्षांपासून आम्ही विजेच्या समस्या मांडल्या होत्या. त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळला. सौर उर्जा प्रकल्पाने आमच्या जीवनात उर्जा आणली. आ. तनपुरे यांनी शिंदे-फडणवीस शासनाला झोपेतून जागे करीत शेतकर्यांना वीज देण्यासाठी भाग पाडल्याचा आनंद पाहता दिवाळी सण आल्याची प्रचिती आम्हा शेतकर्यांना होत असल्याचे सांगितले.