नगर : कांद्याच्या माळा घालून रासपची निदर्शने ; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

नगर : कांद्याच्या माळा घालून रासपची निदर्शने ; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा:  सरकारने जर त्वरित कांद्यास तीन हजार रुपये हमीभाव व विकलेल्या कांद्यास एक हजार रुपये अनुदान जाहीर न केल्यास रासप राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे, असा इशारा रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी दिला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गुरवारी दुपारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कांद्याला तीन हजार हमीभाव व एक हजार अनुदान मिळावे, या मागणीसाठी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन केले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सचिव रवींद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, नगर जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर, शहर अध्यक्ष चिमाजी खामकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्ण राज्यात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकर्‍याने कष्टाने पिकविलेल्या कांद्याने त्याच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक कर्जबाजारी होत आहे. मात्र, सरकार शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी काहीच निर्णय घेत नाही. याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला आहे.

यावेळी मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सचिव रवींद्र कोठारी यांनी भावना व्यक्त केल्या. रासपच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे अर्थातच बाजारपेठेत आवक चांगली झाल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. शेतकर्‍यांना कांदा पिकविण्यासाठी प्रति क्विंटल एक हजर पाचशे रुपये खर्च येतो परंतु, आज बाजारात 300 ते 500 रुपये क्विंटल दराने कांदा विकला जात आहे.

यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होणार आहे. तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकर्‍यांना विकलेल्या कांद्यास प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान व यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान तीन हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. राज्य सरकारने जर ही मागणी त्वरित मान्य न केल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बरोबर घेऊन नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर कांद्यासह तीव्र आंदोलन छेडून मोर्चा काढण्यात येईल. त्यावेळी होणार्‍या परिणामास शासनच जबाबदार असेल. तरी या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हमीभाव देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या द्वारे राज्याचे मुख्यामंत्री व कृषीमंत्री यांना हे निवेदन पाठविण्यात यावे. यावेळी रासपचे युवक अध्यक्ष विकास मासाळ, जिल्हा सरचिटणीस रमेश व्हरेकोटे,आत्मराम कुंडकर, सुवर्णा जर्‍हाड व कोरडकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news