

अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा
कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अहमदनगर तालुक्यातील ससेवाडी येथे घडली. दिलीप आण्णा मगर (वय ५३) असे त्यांचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मगर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
मगर यांच्याकडे सेवा सोसायटी व विविध बँकांचे कर्ज होते. सात एकर जमीन त्यांच्यावर नावावर आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली नैसर्गिक आपत्तीमुळे ते कर्ज फेडू शकले नाहीत.
ससेवाडी गाव कांदा उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव हाेत आहे. यामुळे कांदा पिके वाया गेली. लागवडीसाठी मोठा खर्च येत असून, बदलत्या हवामानामुळे कांदा पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. उत्पन्नाच्या भरवशावर कर्ज काढून कांदा लागवड केली जाते. मात्र मागील काही महिने बदलत्या हवामानामुळे लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
हेही वाचलं का?