कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने तालुक्यातील कोकमठाण गावाचा संपूर्ण शिवार पावसाच्या पाण्याने तुडूंब भरून भरला आहे. त्यामुळे शेतातील सोयाबीन, मका, घास आदी सर्वच पिके सडून गेली आहेत.
शेतकर्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शासन यंत्रणेस याची माहिती देऊन भरपाई मिळावी म्हणून मागणी केली आहे. याकडे तातडीने लक्ष देवून शेतकर्यांना तात्काळ मदत मिळावी, असे बाजार समितीचे माजी सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी पत्रकात म्हटले आहे.
रक्ताटे म्हणाले की, कोकमठाण शिवारात सध्या नागपूर- मुंबई समृध्दी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे असंख्य शेतकर्यांच्या शेतातील पाणी निचरा होऊन जाण्यात आडकाठी निर्माण झालेल्या आहेत. संबंधित शेतकर्यांनी समृध्दी महामार्गाचे प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार या यंत्रणेस याबाबतची वेळोवेळी माहिती देवूनही त्यात कुठल्याही सुधारणा झाल्या नाही. शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.