![बारामती अॅग्रोवर नव्हे, गुन्हा शेतकर्यांवर : नामदेव राऊत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F03%2FNamdev-raut.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कर्जत; पुढारी वृत्तसेवा : बारामती अॅग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांची मानसिकता माणुसकीची असल्यामुळे कर्जत-जामखेडमधील सर्व शेतकर्यांचा ऊस गाळप झाला आहे. त्यामुळे सरकारने बारामती अॅग्रो कारखान्यावर दाखल केलेले गुन्हा कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकर्यांवर आहे, असा आरोप कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
ते म्हणाले, की बारामती अॅग्रोच्या संचालक मंडळावर सरकारने गुन्हा दाखल केला नसून, कर्जत-जामखेडमधील सर्व शेतकर्यांवर आहे. या तालुक्यांतील ऊस तोडताना तो शेतकरी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय किंवा इतर कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले जात नाही. तो शेतकरी कर्जत-जामखेडमधला आहे आणि त्याचे नेतृत्व आमदार रोहित पवार करताहेत एवढेच महत्त्वाचे आहे. बारामती अॅग्रोवरील विश्वासावरच शेतकर्यांनी उसाची लागवड केलेली आहे. या शेतकर्यांना न्याय देणार्या कारखान्याची अडवणूक करण्यासाठीच हा गुन्हा दाखल केला आहे, असेही ते म्हणाले.