

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या कामांवरील स्थगित्या उठविल्या असताना, कर्जत-जामखेडवर अन्याय केला जात आहे. ही सर्व कामे आमदार राम शिंदे यांनी श्रेयासाठी रोखली आहेत, असा आरोप करीत आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आ.पवार यांनी म्हटले आहे की, विकासाच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील लोकांना पाण्याचा गंभीर प्रश्न कायमच सतावत होता.
आमदार झाल्यावर आपण मतदारसंघाची सूत्रे हातात घेऊन जलसंधारणाची आतापर्यंत कधीही न झालेली कामे करून घेतली. तसेच, वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून, शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून जलसंधारणाची विविध कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून आणली आणि त्या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या होत्या. परंतु, सध्याच्या सरकारने दिलेल्या स्थगितीमुळे कामे थांबली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार 25 ऑक्टोबर रोजी कामावरील स्थगिती उठविणे अपेक्षित असताना, विशेषतः नगर दक्षिणमधील फक्त कर्जत आणि जामखेड हे 2 तालुके फक्त राजकीय स्वार्थापोटी त्यातून वगळण्यात आले आहेत.
फक्त श्रेयवादासाठी विरोधकांनी त्यावरील स्थगिती उठविली नाही, असा आरोप आ. पवार यांनी केला आहे. स्थगित केलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये दोन्ही तालुक्यातील मिळून 29 कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि साठवण तलाव यांचा समावेश आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही तालुक्यात मिळून जवळपास 1110 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होणार असून, तब्बल 392 हेक्टर नव्याने सिंचित क्षेत्र तयार होणार आहे. त्याचा फायदा हा आसपासच्या 25 गावातील हजारो शेतकर्यांना होणार आहे. स्थगिती नसती तर आतापर्यंत सर्व कामे सुरू होऊन येत्या पावसाळ्यात त्याचा फायदा शेतकर्यांना झाला असता. परंतु, जनतेच्या हितापेक्षा राजकारण महत्त्वाचे असणार्या लोकांमुळे ही कामे रखडली आहेत, अशी टीका आ. पवार यांनी केली.
श्रेयासाठी गलिच्छ राजकारण सुरू
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सहकार्याची भूमिका असताना, आ.राम शिंदे शासन दरबारी उंबरठे झिजवत आहेत. कर्जत-जामखेडमधील सगळ्याच कामांना स्थगिती द्या, मला त्यांचे श्रेय घ्यायचे आहे, असे म्हणत असल्याने विकासाला बाधा निर्माण होत आहे. हे गलिच्छ राजकारण न थांबल्यास जनता शांत बसणार नाही, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.