नगर : जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी

नगर : जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी पुरेल अशी परिस्थिती आहे. समाधानकारक पावसाअभावी पेरणी फक्त 35 टक्के झाली आहे. गेल्या वर्षीचा उत्पादित झालेला चारा जुलैअखेरपर्यंत पुरणार आहे. पावसाने दडी मारल्यास चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रहीत धरून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी घातली आहे. याबाबत सोमवारी आदेश जारी होणार आहेत.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

आगामी कालावधीत पिण्याचे पाणी आणि चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, मुळा कार्यकारी अभियंता सायली पाटील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, नगरपालिका विभागाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्यासह सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या 14 टक्के बाजरी, 43 टक्के मक्याची पेरणी झालेली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यांत हा चारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय पावसामुळे शेताच्या बांधावर गवतदेखील उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत चाराटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील हिरवा, कोरडा, मूरघास टीएमआर आदी चारा जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत झाला असून, सोमवारी याबाबत आदेश जारी होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नऊ लहान-मोठ्या धरणांत एकूण 38 टक्के पाणीसाठा आहे. सध्या अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांत कमी अधिक प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता पुढच्या पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीटंचाईग्रस गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या 53 टँकर धावत आहेत. आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. हे गृहित धरून, जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी 18 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांत उपाययोजना करण्यासाठी निधी कमी पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी बैठकीत नमूद केले.

चारावाढीसाठी प्रयत्न सुरू
चारा उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत 1 कोटी रुपयांचे बियाणे खरेदी केले जाणार आहे. त्यातून दोन महिन्यात चारा उपलब्ध होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठालाही चारा उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणच्या बीजगुणन केंद्रांत चारा तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दोन कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्या ठिकाणी बियाणे उपलब्ध करून चारा उत्पादित केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news