

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : जळकेवाडी फाटा ते जळकेवाडी रस्ता डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट झाले असून, या कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जळकेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसे निवेदन बांधकाम विभागाला देण्यात आले. पत्रकारांना माहिती देताना दशरथ ढवळे म्हणाले, तालुक्यातील जळकेवाडी फाटा ते जळकेवाडी रस्त्याचे काम आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतले. त्यानंतर डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने एका रात्रीच पूर्ण केले आहे. कामात डांबराचा कुठेही पत्ता नाही. हाताने रस्ता उखडला जात आहे.
अंदाजपत्रकानुसार या रस्त्याचे काम झाले नाही. सर्व बांधकाम विभागाचे अधिकारी या कामाकडे फिरकले नाही. ठेकेदाराने मनानेच रस्त्याचे काम पूर्ण केले. अधिकार्यांनी कोणतीही पाहणी न करता रस्ता पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी या कामाची शासनाच्या गुण नियंत्रण समितीमार्फत चौकशी व्हावी, तसेच अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करून द्यावे, अशी मागणी ऋषिकेश ढवळे, माऊली येडाळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली. माजी सरपंच बापूराव ढवळे म्हणाले, या रस्त्याचे काम खराब करण्यात आले. विहिरीच्या परिसरातील पूल चुकीच्या पद्धतीने केला. या पुलाला टाकलेल्या नळ्या जमिनीत बुजल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकर्यांच्या विहिरीमध्ये जाणार आहे. मातीही वाहून जाईल. अधिकार्यांनी पाहणी करून रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार करून द्यावे.