कर्जत : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात. अन्यथा, राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर आंदोलन करील, असा इशारा पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी दिला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन नको वेतन हवे, राज्य सरकारचा दर्जा देण्यात यावा, यांसह विविध मागण्यांसाठी मागील एक महिन्यांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कर्जतचे तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसील कार्यालया बाहेर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, शहराध्यक्ष अमोल क्षीरसागर, सोनू भिसे, सुनिता कुलकर्णी, कविता भवर, स्नेहा शिंदे, सविता गांगर्डे, सविता बनकर, सारिका पवार, विजया खराडे, संगीता थोरात, श्रुती जाधव, वर्षा कांबळे, मनीषा माने, उषा ढेरे, प्रियंका तोरडमल, अश्विनी यादव, राणी तांदळे, सुनिता जगदाळे, दीपा शिंदे, शबाना पठार, ऐश्वर्या चांगन, सीमा कांडेकर, कमल तोरडमल, अंजुषा खोमणे, आरती म्हस्के, अश्विनी क्षीरसागर, राणी गोरे आदी उपस्थित होते.
यावेळी कोठारी म्हणाले, राज्यभर अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातच याबाबत निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याची गरज होती. मात्र, झोपलेल्या सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा विचार केला नाही. जे सरकार जनतेच्या मागण्यांचा विचार करत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मागील एक महिन्यांपासून राज्यभरातील सर्व अंगणवाड्या बंद आहेत.
यामुळे बालकांच्या कुपोषणाचा गंभीर प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. मात्र, सरकारच कुपोषित असल्यामुळे त्यांना याचे गांभीर्य समजत नाही. या मागण्यांचा सरकारने तात्काळ विचार करून त्या पूर्ण कराव्यात. अन्यथा, राष्ट्रीय समाज पक्ष सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करील, असा इशारा त्यांनी दिला. अमोल क्षीरसागर म्हणाले, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष सुरू आहे. त्यांना वेतनश्रेणी लागू करण्याची आवश्यकता आहे. तीस ते पस्तीस वर्षे काम करूनही त्यांना आजही मानधन दिले जाते. त्यांचे काम अतिशय कष्टाचे आहे. त्यांच्या हक्काचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे.
सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करताना मुंबईत होणार्या आंदोलनात राज्यभरातून लाखो अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा