संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे कालव्यासाठी मोठा निधी मिळवून रात्रंदिवस काम सुरू ठेवले. डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे ऑक्टोबर 2022 पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले. ही कामे आपणच केली आहेत. परंतु काहीजण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनेसाठी आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच 782 कोटी रुपयांचा निधी मिळवला असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आर. बी. राहणे हे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, अर्चना बालोडे, संतोष मांडेकर, विलास कवडे आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले की, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा या गावांच्या पाणीपुरवठा योजने करता 59 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. याचबरोबर निमगाव जाळी, कोल्हेवाडी, तळेगाव, निमोण, निमगाव, घुलेवाडी या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच 782 कोटी रुपयांचा मोठा निधी मिळवला. यातून या परिसरातील गावांच्या पुढील 25 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे.
महाविकास आघाडी सरकार मधून सातत्याने निधी मिळवला. विकास कामे केली. हा निधी मागील सरकारच्या काळातील आहे. सध्याचे पालकमंत्री मात्र मागील सरकारच्या काळातील मंजूर झालेल्या कामे व निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रह करत आहेत. काम कोण करते आणि प्रसिद्धीसाठी कोण पुढे येते हे सर्व जनतेला माहिती आहे.
मिलिंद कानवडे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून पाणीपुरवठा योजनांसाठीच्या सर्व मंजुरी या 11 मे 2022 रोजी मिळाली आहे. आणि सध्याचे सरकार ही 30 जून 2022 रोजी सत्तेवर आले आहे. या निधी मंजुरी मध्ये 'खोके' सरकारचा काहीही संबंध नाही. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब एरंडे यांनी केले तर किरण नवले यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी काही खबरे काम करत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. विकास कामात अडथळे आणणार्या या खबर्यांचा बंदोबस्त जनताच करेल.
आ. बाळासाहेब थोरात