समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात ! तीन जण जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी | पुढारी

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात ! तीन जण जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी

कोपरगाव प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात औरंगाबादकडून शिर्डीकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने पुढे असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. जखमींना प्रथम वैजापूर, घाटी व नंतर संभाजीनगर येथील सिग्मा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली. अपघात इतका भयानक होता की क्रेनच्या साह्याने चक्काचूर झालेल्या कारला बाजूला करण्यात आले.  राहुल श्रीमंत राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे अशी तिघा मृत व्यक्तींचे नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रात्री 9.30 च्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारचा कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले.

या अपघातातील मृत राहुल श्रीमंत राजभोज (35रा निमखेडा), उमेश दामोदर उगले (28, रा भातोडी), भाऊसाहेब नामदेव पैठणे (35)  दहेगाव हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी आहेत. ते सर्व शिर्डीकडे निघाले होते. अपघातात शिवहरी पांडुरंग फलके( वय 33,  तपोवन ) आणि नरेंद्र मनसुखलाल वाघ (55, टेंभुर्णी तपोवन ) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले आहे.

अपघातांची मालिका सुरूच…

बुधवार दिनांक सात रोजी या समृद्धी महामार्गावर धोत्रे शिवारातच अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कल्याणचे दोघेजण जागीच ठार झाले होते. त्यातच पुन्हा शुक्रवारी अपघात झाला. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबता थांबेना. बहुतांशी वाहन चालक भरधाव वेगाने आपली वाहने चालवतात तर त्यातील काही मद्यधुंद अवस्थेत असतात, त्यामुळे असे अपघात होतात असे ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितले.

Back to top button