नगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात 73 बालविवाह रोखण्यात आले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, विवाह सोहळ्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त चांगला मानला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता असून, या दिवशी गावागावांतील ग्राम-बालसंरक्षण समित्यांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे व 21 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे लग्न लावले जाऊ नये, यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आला. परंतु ग्रामीण भागात सर्रास बालविवाह लावले जात आहेत. महिला व बालकल्याण विभागाने 2021 मध्ये 36 व 2022 मध्ये 37 बालविवाह रोखले आहेत. या प्रकरणी गेल्या दोन वर्षांत 8 गुन्हेही दाखल झाले आहेत.
अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येतात. हा प्रकार रोखण्यासाठी गावागावांत सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम-बालसंरक्षण समित्या कार्यरत आहेत. बालविवाह होऊ नयेत याची जबाबदारी या समित्यांवर टाकण्यात आली आहे.
बालविवाह आढळून आल्यास संबंधित कुटुंब व लग्नसमारंभास उपस्थित वर्हाडींवरही कारवाई केली जाते, असे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांनी सांगितले. 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. या सणाच्या दिवशी जिल्हाभरात कोठेही बालविवाह होणार नाहीत, यासाठी अलर्ट राहण्याचे निर्देश ग्रामसेवकांनाही दिले आहेत. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रचार व प्रसार केला जात आहे. मंडप डेकोरेटर्स, लग्न लावणारे धार्मिक गुरू, मंंगल कार्यालयाचे व्यवस्थापक, बॅड पथकाचे व्यवस्थापक, हॉटेल व्यवस्थापक, केटरर्स व इतर व्यावसायिक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 या कायद्याची माहिती दिली जात आहे.
…तर पालकांना तुरुंगवास
बालवयात लग्न लावून देणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. या कायद्याचे पालन न केल्यास दोन वर्षांसाठी सक्तमजुरी व एक लाखाचा दंड आहे. बालविवाह लावल्याचे उघडकीस आल्यास मुली आणि मुलाकडील अशा दोन्ही पालकांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांनी सांगितले.