साडेचार महिन्यांत 729 मि.मी. पाऊस ; गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस

साडेचार महिन्यांत 729 मि.मी. पाऊस ; गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात 1 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सरासरी 729.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी 668.8 मि.मी. पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अकरा टक्के अधिक पाऊस झाला. मात्र, पाथर्डी, जामखेड, शेवगाव, श्रीरामपूर या चार तालुक्यांत मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. पाऊस अधिक झाल्याने यंदाचा रब्बी हंगाम जोमात असणार आहे
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. यंदा देखील हीच परिस्थिती आहे. जून महिन्यात सरासरी 108.2 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, यंदा 113.6 मि.मी. पावसाची नोंद झाली.जुलै महिन्यात 97.5 मि.मी. अपेक्षित असताना जिल्ह्यात 121.2 मि.मी. पाऊस झाला आहे.ऑगस्ट महिन्यात 95.4 मि.मी. पावसापेक्षा 109 मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात सरासरी 147 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यंदा मात्र तब्बल 233.8 मि.मी. पाऊस झाला आहे.

यंदा प्रत्येक महिन्यात जादा पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी 729.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे दीड लाखांपेक्षा अधिक शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असल्याची शक्यता आहे.

जामखेडमध्ये सर्वात कमी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के पाऊस अधिक झाल्याची नोंद आहे. मात्र, चार तालुक्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या वर्षी 173 टक्के पाऊस झाला. यंदा मात्र 111.4 टक्क्यांवर समाधान मानावे लागले. शेवगाव तालुक्यात 158 टक्के होता. यंदा 139 टक्के पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यात यंदा 118.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी मात्र 131.8 मि.मी. पाऊस झाला आहे. जामखेड तालुक्यात गेल्या वर्षी 114 टक्के पावसाची नोंद होती. यंदा मात्र 104.4 मि.मी. पाऊस झाला आहे.

खरीप हंगामात नुकसान झाले असले तरी, रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. सध्या सर्वच लहान- मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. अद्याप नद्या दुथडी वाहत असून, गावागावांतील तलावांत पाणी साचले आहे. परिणामी जिल्ह्यातील भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढूली असून, उन्हाळ्यातील पाणीटंचाईची कमी होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात 97 ठिकाणी अतिवृष्टी
प्रत्येक महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली. जून महिन्यात 8, जुलै महिन्यात 5, ऑगस्ट महिन्यात 13 तर सप्टेंबर महिन्यात 36 तर ऑक्टोबर महिन्यात 35 ठिकाणी अतिवृष्टी झाली. नगर, अकोले, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यांत एकाच महिन्यात एकाच मंडळात दोनदा अतिवृष्टी झाली आहे. शेवगाव व राहाता तालुक्यात एकाच महिन्यात दोन मंडळांमध्ये दोनदा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.

तालुकानिहाय एकूण पाऊस (मि.मी.)
नगर 725.5, नेवासा 722.9, श्रीगोंदा 715.3, पारनेर 655.7, , पाथर्डी 606.5, शेवगाव 732.4, संगमनेर 645.7, अकोले 1086.6, श्रीरामपूर 647.6, राहुरी 713.4, कर्जत 728.2, जामखेड 671.9, राहाता 713.3, कोपरगाव 795.5.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news