

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गोमांसावर बंदी असली तरी, नगर शहरात सर्रासपणे या गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू आहे. या कत्तलखान्यांसाठी ग्रामीण भागातून जनावरे पुरविली जात असल्याचे वारंवार आढळून आलेले आहे. नगर शहरातील कत्तलखान्यांचे नगर तालुक्यातील वाळकी गावाशी असलेले कनेक्शनही अनेकदा उघड होत आहे. पुन्हा एकदा वाळकीत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची नगर तालुका पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत सुटका केलेली सर्व लहान-मोठी जनावरे ही देशी जातीची असल्याचे समोर आले आहे. वाळकीतील जिल्हा परिषद शाळेच्या पुढील बाजूस एका घराच्या आडोशाला संरक्षक भिंत बांधलेल्या मोकळ्या गोठ्यात ही गोवंशीय जनावरे कत्तलखान्यात नेण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली होती. याबाबत एका व्यक्तीचा निनावी फोन शनिवारी (दि.16) रात्री 11 च्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला गेला.
नियंत्रण कक्षातील हवालदार आबनावे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार एस. एस. सरोदे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी ही माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना कळविली. त्यांनी रात्री गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक चव्हाण यांनी लगेच सहायक फौजदार बी. ए. गुंजाळ, कॉन्स्टेबल संभाजी बोराडे, चालक गोरे यांच्यासह वाळकी गाठली.
वाळकीच्या शिवारात बीएसएनएलच्या कंपाऊंडच्या भिंतीच्या कडेला असलेल्या मुनाफ पटेल (रा. झेंडीगेट, नगर) याच्या मालकीच्या मोकळ्या जागेत चार गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने हालचाल करता येणार नाही, अशा पद्धतीने बांधलेली होती. त्यांना पुरेसे अन्न पाणी व निवारा न देता त्यांची उपासमार होईल, अशा स्थितीत ही जनावरे आढहून आली. पोलिसांनी या जनावरांची सुटका करत जागा मालक मुनाफ पटेल (रा. झेंडीगेट,नगर) याच्या विरुद्ध संभाजी बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.