कानिफनाथ देवस्थान विश्वस्तांमध्ये हाणामारी ; काठ्या, पाईपचा वापर
मढी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून बैठकीत गुरूवारी (दि.14) सकाळी जोरदार राडा झाला. मागील मतभेद उफाळून आल्याने दोन्ही बाजूंच्या समर्थकांसह विश्वस्त परस्परांशी भिडले. त्यांच्यात काठ्या, लोखंडी गजाने जोरदार हाणामारी झाली. अचानक सुरू झालेला गोंधळ, शिवीगाळ, आरडाओरडा यामुळे भाविकांची पळापळ झाल्याने, कानिफनाथ गडावर तणाव निर्माण झाला. देवस्थानचे विश्वस्त राधाकिसन मरकड व संजय मरकड दोघेही अध्यक्षपदावर दावा सांगत असून, याबाबतचा वाद धर्मदाय आयुक्तांपुढे सुरू आहे.
अध्यक्ष म्हणून कामकाज थांबवून महत्त्वाच्या दालनासह कपाटांना दोन्ही गटाकडून कुलपे ठोकण्यात आलेली आहेत. देवस्थान समितीकडे एकरकमी देणगी देऊन, त्यामध्ये विशिष्ट तारखेला दान देणार्यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत दिली जात होती. दररोज हजारो भाविक या सुविधेचा लाभ घेत होते. मात्र, धनादेशावर सह्या नेमक्या कोणाच्या घ्यायच्या, यावरून कर्मचार्यांचे पगार व किराणा बिले रखडून महाप्रसाद सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. धर्मदाय खात्याच्या अधिकार्यांनी वारंवार होणार्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून ठोस कारवाई केली असती तर, आजचा प्रकार टळू शकत होता, असे मत भाविकांनी व्यक्त केले आहे. विश्वस्त मंडळावर प्रशासकीय नियुक्ती होऊन, तक्रारींची सखोल चौकशी केल्यास वादाचे मूळ सापडणार आहे.
विश्वस्त मंडळापैकी सचिन गवारे, विमल मरकड, राधाकिसन मरकड, रवींद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड, शामराव मरकड, शिवजीत डोके, विलास मरकड, संजय मरकड हे गुरूवारी सकाळी जमले होते. अध्यक्षपदावर हक्क सांगणारे संजय मरकड यांनी अध्यक्ष उपस्थित असताना उपाध्यक्ष बैठक घेऊ शकत नाहीत. न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला आहे. ही बैठक बेकायदेशीर आहे, असे उर्वरित विश्वस्तांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवजीत डोके यांनी एकूण 11 विश्वस्तांपैकी दहा जण एका बाजूला असून, बहुमताने आम्हाला बैठक घेता येते, असे म्हणत प्रोसिडिंग बुकवर नावे लिहायला सुरुवात केली.
त्यानंतर आवारातील वाद मिटवून स्थानिक विश्वस्तांनी सर्वांना बारादरी म्हणजेच दानपेट्या मोजणी कक्षात नेले. तेथे शाब्दिक चकमकीतच प्रोसिडिंग बुकवर उपस्थितांची नावे लिहिण्यास प्रारंभ करताच, संजय मरकड यांनी प्रोसिडिंग बुक हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही गट शिवीगाळ करत परस्परांना भिडले. यामध्ये काहींचे कपडे फाटले. काही जण किरकोळ जखमी झाले. तेथे स्थानिक विश्वस्तांनी दोन्ही गटांना बाजूला केले. बाहेर आल्यावर समाधी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत समर्थकांकडून पुन्हा बोलाचाली सुरू झाली. त्यांचे रूपांतर शिवीगाळ व अंगावर धावून जाण्यात झाले. जमावतील काही जण बाजूच्या कोपर्यातील पाईप, काठी उचलून धावले. विश्वस्त नसलेल्यांपैकी काहींनी काठी व पाईपने मारहाण सुरू केली. संपूर्ण काम दगडी असल्याने अनेकांना दगडाचा मुका मार लागला. भांडणे सोडविणार्यांची संख्या वाढल्याने, अखेर दोन्ही गट बाजूला झाले. जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे संजय मरकड यांच्या डोक्याला टाके घालण्यात आले. त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाल्याने तात्काळ नगरला हलविण्यात आले. उर्वरित जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विश्वस्त शिवजीत डोके यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार संजय मरकड, संकेत मरकड, दत्ता मरकड, अक्षय कुटे, बाळासाहेब मरकड, प्रतिक काळदाते यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. तक्रारीत म्हटले आहे की, 9 नोव्हेंबरच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संजय मरकड यांना सर्वानुमते पदावरून काढून टाकण्यात आले होते. उपाध्यक्ष सचिन गवारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे नियोजन होते. ट्रस्टच्या कार्यालयाला कुलूप असल्याने विश्वस्त सचिन गवारे, विमल मरकड, राधाकिसन मरकड, रवींद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड, रामराव मरकड, विलास मरकड अशा विश्वस्तांची आवारात मिटिंग सुरू होती. तेथे माजी अध्यक्ष संजय मरकड व इतर दहा पंधरा जण जमाव करून आले. तुम्ही मिटींग कशी घेता, म्हणत संजय व संकेत यांनी काठीने व इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. माझा भाऊ प्रसाद भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. तुम्ही परत मीटिंगसाठी आला तर, गोळ्या घालून मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, सायंकाळपर्यंत दुसर्या गटाची तक्रार दाखल नसल्याने अधिकृत माहिती समजू शकली नाही व वादाचे मूळ कारण कळाले नाही.
धर्मदाय आयुक्तांनी कारवाई करण्याची गरज
धर्मदाय आयुक्तांनी या वादाकडे गांभीर्याने पाहून तात्काळ चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची गरज आहे. दोन्ही गटांमध्ये परस्पर तणाव वाढला असून, हा वाद कुठल्याही क्षणी विकोपाला जाऊ शकतो. भाविकांनी महाप्रसादासाठी देणगी देऊनही, तो पूर्वीसारखा मिळत नसल्याने देवस्थान समितीच्या विश्वासाला सुद्धा तडा जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विश्वस्त मंडळातील वाद सुरू असून, न्यायालय, धर्मादाय आयुक्त आदींकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तक्रारी दाखल आहेत. दैनंदिन कामकाज वादामुळे ठप्प झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.