

लोणी : पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीला झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचारांचा खर्च महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या असून, जखमींच्या उपचारांची सर्व माहिती मंत्र्यांनी डॉक्टरांकडून जाणून घेतली. विश्वसंत साईबाबा पालखीला संगमनेर तालुक्यातील माऊली घाटानजीक अपघात झाला. राहाता तालुक्यातील कनकुरी येथील भाऊसाहेब नाथा जपे, कोर्हाळे येथील ताराबाई गमे, शिर्डी येथील बबन थोरे आणि कोपरगावचे बाबासाहेब गवळी या चार वारकर्यांचा मृत्यू झाला.
अन्य काही वारकर्यांना संगमनेर येथील कुटे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांनी सर्व जखमी व्यक्तींवर तातडीने आवश्यक उपचार करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या होत्या. रात्री उशिरापर्यत जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह स्थानिक अधिकारी रुग्णालयात थांबून होते. मंत्री विखे पाटील यांनीही उपचारांची माहीती डॉक्टरांकडून जाणून घेतली.