कर्जत : मका पिकाचे आगर होत असलेल्या कर्जत तालुक्याला दुष्काळामुळे मोठा फटका बसला आहे. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यात तब्बल 21 हजार 500 हेक्टर अशी विक्रमी मका पेरणी करण्यात आली. तालुका मका पिकाचे आगर अशी नवीन ओळख निर्माण करत असतानाच, लहरी निसर्गाचा फटका शेतकर्यांना बसला. पेरणीनंतर पुरेसा पाऊस न पडल्यामुळे अपेक्षित उत्पादन झाले नाही. शेतकर्यांना तब्बल 70 टक्के नुकसान सहन करावे लागले. तालुक्यात खरीप हंगामामध्ये तालुक्यात बाजरी, उडीद, तूर, मूग या पिकांना शेतकरी प्राधान्य देत होते. मात्र, मका पिकाचा शेतकर्यांना जनावरांसाठी होत असणारा फायदा, तसेच मक्याच्या उत्पादनानंतर मिळणारा भाव, हे सर्व फायदेशीर वाटत असल्यामुळे तालुक्यात बागायती बरोबरच जिरायत क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मका पिकाची पेरणी सुरू झाली. सन 2016 -17 पेक्षा यावर्षी कितीतरी पटीने मका पिकाचे क्षेत्र वाढल्याचे दिसून आले.