राज्यमार्ग अरुंद करण्याचा घाट ; राशीनची बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याचा धोका | पुढारी

राज्यमार्ग अरुंद करण्याचा घाट ; राशीनची बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याचा धोका

राशीन : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील राशीनच्या मुख्य बाजारपेठेतून जाणार्‍या दौंड-उस्मानाबाद राजमार्गाचे काम बाजारपेठेत अरुंद करण्याचा घाट बांधकाम विभाग व ठेकेदाराने घातला आहे. त्यामुळे राशीनची बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने पूर्वीच्या गटाराची हद्द कायम करून रस्त्याचे काम केल्यास कोणत्याही व्यावसायिकाचे नुकसान न करता रस्ता रुंद होईल. परंतु, यासाठी खासदार सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी व्यापार्‍यांसह ग्रामस्थांनी केली. तसेच, बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर टाकण्यात येणारे दुभाजक आणि पथदिवे बाजारपेठेबाहेर करमाळा रस्त्यावर टाकण्याचे नियोजन आहे. याबाबत राशीनकरांना कुठलीही कल्पना नाही.

राज्यमार्गाचे काम तातडीने उरकण्यासाठी सर्व अतिक्रमणे जागेवर ठेवून त्याच्या अलिकडे गटाराचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री जगदंबा देवीच्या दसरा उत्सवाच्या तोंडावर मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होणार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून चौकामधील प्रवेशद्वाराजवळ फक्त गटारीचे खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांसह व्यापार्‍यांना याचा त्रास सहन करावा लागतो. दसर्‍यापर्यंत गटाराचे काम पूर्ण करा, अन्यथा खड्डे बुजवा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली. राशीनच्या बाजारपेठेतील रस्ता प्रशस्त होण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घ्यावा.
                                                                           – नीलम साळवे, सरपंच, राशीन

नवीन प्रवेशद्वार उभारावे
जुन्या गटारापर्यंत हा रस्ता व्हावा, तसेच चौकामधील प्रवेशद्वारास तडा गेल्याने ते धोकादायक बनले आहे. ते काढून तेथे नव्याने प्रवेशद्वार उभारावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक नेते श्याम कानगुडे यांनी केली आहे.

Back to top button