नगरमध्ये माझी माती, माझा देशला प्रारंभ
नगर : पुढारी वृत्तसेवा : आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशामध्ये मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान राबवण्यात येत आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने आज पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते हातात दिवा घेऊन मातीचे पूजन करण्यात आले. माझी माती माझा देश अभियानांतर्गत पंचप्रण शपथ घेण्यात आली. त्यात भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू.
देशाच्या समृद्ध वारसांचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणार्या प्रति सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली. त्याचबरोबर 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान वसुंधरा वंदननिमित्त 75 वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमृत वाटिका तयार केले जाईल. स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन केले जाणार असून त्यांच्या नावाचे शिल्प उभारले जाणार आहे. याचबरोबर वीरांचा सन्मान केला जाणार आहे. उत्साहात झेंडावंदन कार्यक्रम पार पडणार आहे.
नागरिकांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा झेंडा फडकवत त्याला वंदन करायचे आहे तरी नगरकरांनी आझादी का अमृत कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, हा कार्यक्रम देशासाठी शहीद झालेल्या जवानांना समर्पित करायचा आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी दिली.
यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुर्हे, उपायुक्त अजित निकत, उपायुक्त सचिन बांगर, लेखाअधिकारी शैलेश मोरे, लेखापरीक्षक विशाल पवार, नगरसेविका आशाताई कराळे, पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम, शेखर देशपांडे, डॉ. अनिल बोरगे, अशोक साबळे, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजन आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
पुणे : बागायत 10, जिरायत 20 गुंठ्यांपर्यंत खरेदी करता येणार
पुणे : दारू न पाजल्याने स्क्रूड्रायव्हर एकाच्या पोटात खुपसला