

श्रीरामपूर: पुढारी वृत्तसेवा : बचत गटाचे हफ्ते भरले नाही म्हणून महिलेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे घडली. यावेळी आरोपींनी घरासमोरील दुचाकीही जाळल्या. याबाबत श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघा आरोपींना गजाआड केलेले आहे. पाहुणेनगर खटकाळी गावठाण येथे रुखसाना ईक्बाल शेख या राहात असुन त्यांनी बचत गटामार्फत कर्जे घेतले होते. त्यातील काही महिलांनी कर्ज वेळेवर भरले नाही म्हणून रुखसाना यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत त्याच परिसरात राहणारे चव्हाण यांना सांगितले. त्याचा राग आल्यामुळे या दोन कुटुंबात वाद झाले होते. त्यावेळी मोठा जमाव बेलापूर दूरक्षेत्रात जमा झाला होता. या वेळी तक्रार देण्यास कुणीही पुढे आले नाही.
याच गोष्टीचा राग मनात धरुन राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण याने आपल्या चार ते पाच साथीदारां समवेत लाकडी दांडके धारदार हत्यारे घेवुन मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास रुकसाना शेख यांच्या घरावर हल्ला चढविला. घराच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. बाथरुमचाही दरवाजा तोडण्यात आला. शिलाई मशिन फोडण्याचा प्रयत्न केला तसेच घरासमोर दोन मोटार सायकली लावालेल्या होत्या त्यावर पेट्रोल टाकुन त्या पेटविण्यात आल्या.
हा प्रकार सुरू असतानाच रुक्साना शेख यांचे समोर राहणारे नातेवाईक सुलताना युसुफ पठाण या मदतीकरीता धावल्या असता त्यांच्यावर धारदार शस्राने वार केला. त्यामुळे त्या जखमी झाल्या. तेथेच राहणारे फिरोज पठाण याने बेलापूर पोलिस दूरक्षे त्रात फोन केला. अगदी काही वेळेतच बेलापूर पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांना पहाताच पप्पू चव्हाण शहारुख शेख व त्यांच्या साथीदारांनी पळ काढला पोलिसांनी तातडीने शहारुख सांडू शेख व पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सुलताना युसुफ पठाण यांच्या फिर्यादीवरुन शहारुख सांडू शेख, पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण व इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि. जीवन बोरसे हे करत आहेत.
गावात सर्व धर्मिय गुण्या गोविंदाने राहत आहेत. काही गुंड बाहेर गावातून येवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते खपवुन घेणार नाही. गावाची शांतता बिघडविणार्या व्यक्तींचा सर्व ग्रामस्थ मिळून बंदोबस्त करू.
-शरद नवले, मा. जि. प. सदस्य