लोणी : आठ तासांच्या जनता दरबारात सुटले प्रश्न! | पुढारी

लोणी : आठ तासांच्या जनता दरबारात सुटले प्रश्न!

लोणी/ आश्वी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचा जनता दरबार नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रशासनातील अधिकारी आणि नागरीक यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न या जनता दरबारातून होतो. रविवारी तब्बल 8 तास चाललेल्या दरबारातून नागरीकांचे प्रश्न सोडवून मंत्री विखे पा. यांनी स्वतःमधील संवेदनशीलता दाखवून दिली. राज्यातील काही मोजके राजकारणी नागरीकांचे प्रश्न सोडविण्यास जनता दरबाराचे आयोजन करतात. विखे पा. परीवाराने जनता दरबाराची प्रथा अनेक वर्षे सुरु ठेवून नागरीकांशी बांधिलकी जोपासली आहे.

महिन्यातून एकदा जनता दरबाराचे आयोजन मंत्री विखे पा. यांच्याकडून केले जाते. मतदार संघासह जिल्ह्यातील नागरीक व कार्यकर्ते आवर्जून दरबारात येवून आपल्या समस्या विखे पा. यांच्या कानावर घालतात. शक्य असेल तिथेच संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या सूचना दिल्या जातात.

सार्वजनिक प्रश्नांसंदर्भात योग्य समन्वय साधून नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंत्री विखे पा. यांच्या जनता दरबारातून होत असल्याने अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नामध्ये योग्य मार्ग निघाल्याचा अनेकांचा अनुभव या दरबाराचे फलित असल्याचे नेहमी बोलले जाते. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या दरबारात मंत्री विखे पा. यांनी आपल्या कार्यालयात तब्बल 8 तास थांबून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांनी शेवटच्या माणसाचे निवेदन स्वीकारत दिलासा दिला. प्रत्येक कागद वाचून त्यांनी काही नागरीकांच्या अर्जावर स्वत:सूचना लिहीत प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

मंत्री विखे पा. यांच्याकडे काम घेवून गेले की न्याय मिळतो, हा विश्वास असल्याने त्यांच्या जनता दरबारला होणारी गर्दी लक्षणीय असते. रविवारी झालेल्या जनता दरबारात भेटणार्‍या लोकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. दुपारी 2 वा. सुरू झालेल्या दरबारात रात्री 11 वा. शेवटच्या माणसाचा अर्ज स्वीकारत मंत्री विखे पा. यांनी संवेदनशीलता दाखविली.

प्रत्येक नागरीकाला न्याय देण्याची नेहमी भूमिका

समस्या घेवून येणार्‍या कोणत्याही नागरीकाला न्याय देणे ही भूमिका सार्वजनिक जीवनात काम करताना कायम ठेवली. प्रश्न व्यक्तिगत असो की, सार्वजनिक तो मार्गी लागणे महत्वाचे असते. यासाठी प्रशासनात अधिकारी व नागरीक यांच्यात योग्य समन्वय साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आपण नेहमी करतो. या माध्यमातून जनतेला एक विश्वास व समाधान मिळते, असे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी जनता दरबारात स्पष्ट केले.

हेही वाचा 

पारनेर : गटशिक्षणाधिकारी बुगे यांच्यावर पुष्पवृष्टी; निरोप समारंभात दुचाकी भेट

कोळपेवाडी : जवान आहेरांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

WB Panchayat Election : प. बंगालमध्‍ये मतमोजणीवेळीही हिंसाचाराचे सत्र सुरुच

Back to top button