शिर्डी : बैलगाडा शर्यतीचा लढा सर्वांच्या प्रयत्नांमुळे जिंकला : मंत्री विखे | पुढारी

शिर्डी : बैलगाडा शर्यतीचा लढा सर्वांच्या प्रयत्नांमुळे जिंकला : मंत्री विखे

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बैलगाडा शर्यती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी स्वागत केले. ते म्हणाले, हा विजय सर्वस्वी माय-बाप शेतकर्‍यांचा आहे. 12 वर्षांपासून सुरू असलेला लढा सर्वांच्या प्रयत्नांमुळे जिंकता आल्याचे समाधान वाटते.

न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विखे पा. म्हणाले, बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यासाठी अनेक वर्षे लढा देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या 12 वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्यात न्याय मिळावा म्हणून केलेल्या सामुहिक प्रयत्नांना यश मिळाल्याचे मंत्री विखे म्हणाले.
बैलगाडा स्पर्धांकरीता सरकारने यापुर्वीच केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविला.

याचे मोठे समाधान आजच्या निकालातून मिळाल्याचे सांगत मंत्री विखे यांनी राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामवंत वकिलांची टीम उभी केली होती. बैलगाडा संघटनेसमवेत सातत्याने बैठका सुरू होत्या. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांचे यश आजच्या निकालात प्रतिबिंबीत झाल्याचे ते म्हणाले.

बैलगाडा शर्यंतीसंदर्भात ग्रामीण भागात मोठी आत्मियता आहे. या स्पर्धेतून रोजगारही निर्माण होत असल्याने स्पर्धा पुन्हा सुरू करण्यास मिळालेला हिरवा कंदील माय-बाप शेतकर्‍यांच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. खिल्लारी, देशी गोवंश संवर्धनाच्यादृष्टीने आजचा न्यायालयाचा निकाल पाठबळ देणारा ठरेल, असा विश्वास मंत्री विखे पा. यांनी व्यक्त केला.

Back to top button