खानोटा पुलावरून प्रवास नको रे बाबा !
खेड (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राशीन-भिगवण राज्यमार्गावर नवीन खानोटा पुलावरून प्रवास करणे दुचाकी,चारचाकी चालकांच्या जीवावर बेतणारे आहे. त्याला कारणही तसंच आहे, राज्यमार्गावर (खानोटा ता.दौंड) हद्दीत पूल बांधला खरा परंतु पुलावर टाकलेल्या डांबरावर ठराविक अंरावर बसवण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्या निखळल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग तथा संबंधित ठेकेदाराकडून याकडे लक्ष दिले जात नाही.
वेगाने आलेल्या अनेक दुचाकी या लोखंडी पट्ट्यात अडकून पडल्या असून, काहीजण जखमी झाले आहेत. नव्याने झालेल्या या पुलावरील काही काम अद्यापही बाकी आहे. तसेच, पुलावर तयार करण्यात आलेल्या साईडपट्ट्याही अपूर्ण आहेत. रस्ता सुरक्षिततेसाठी कसलीच काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाहनचालक व प्रवासी करत आहेत. मात्र, या तक्रारींकडे ना संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. रस्त्यावरील लोखंडी पट्ट्या या अगोदरही अनेकवेळा निखळल्या आहेत; परंतु तात्पुरत्या डागडुजीने प्रवाशी वाहन चालकांचे समाधान करण्यात येत आहे. मोठा अपघात होऊन या अपघातात कुणाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.