भरपाई द्या, अन्यथा आंदोलन : आ. प्राजक्त तनपुरे
राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या उभ्या पिकांचे सरसकट पंचनामे करा. फक्त उभ्या पिकांचे पंचनामे करण्याचे धोरण लवचिक करा. कांदा काढून शेतात वाळण्यासाठी पोळी लावल्या, त्याचे मोठे नुकसान झाले. ते पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
शेकडो शेतकर्यांसह आ. तनपुरे यांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना निवेदन दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, शेतकरी विठ्ठल मोकाटे, पंढरीनाथ पवार, भारत तारडे, विजय डौले, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, मधुकर पवार, बाळासाहेब खुळे, चंद्रकांत पानसंबळ, सुयोग नालकर, विलास शिरसाट, किरण गव्हाणे, ओंकार कासार, राजेंद्र बोरकर, संतोष आघाव, पांडू उदावंत, दिनकर पवार, डॉ. राजेंद्र बानकर यावेळी उपस्थित होते.
आ. तनपुरे म्हणाले, तालुक्यात मागील महिन्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी, गारपीट, वादळ झाले. पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः कांदा उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचे फक्त उभ्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश झाले. वस्तुतः सध्या उभी पीके अवघे दोन-तीन टक्के आहेत. शेतात कांदा भिजल्याने नुकसान झाले. त्याचे पंचनामे होत नाहीत, असे निदर्शनास आले. पंचनामे झाले पाहिजे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. अतिवृष्टीच्या अनुदानास फक्त राहुरी महसूल मंडळ पात्र ठरले, त्यात फक्त 40 टक्के शेतकर्यांना मदत मिळाली. घोषणा होतात. शेतकर्यांच्या हाती काहीच पडत नाही. शेतकर्यांबद्दल संवेदनशील व गतिमान नसलेले शासन पहायला मिळते, असे आ. तनपुरे म्हणाले.