कोळपेवाडी : पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा : आ. काळे
कोळपेवाडी(नगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव मतदारसंघात सुरू असलेल्या अनेक गावातील रेंगाळलेल्या पाणीपुरवठा योजनांचे काम तातडीने पूर्ण करा. ज्या पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू झाली नाहीत, ती कामे तातडीने सुरू करा. कामात हयगय झाल्यास कोणत्याही अधिकार्याची गय केली जाणार नाही, अशी तंबी आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा आ. काळे यांनी घेतला. यावेळी बैठकीत उपस्थित अधिकार्यांना त्यांनी सूचना करून कामात हलगर्जी करणार्या अधिकार्यांचे चांगलेच कान उपटले.
यावेळी आ.काळे यांनी मतदार संघातील जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या 33 पाणीपुरवठा योजना व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत चास नळी, कुंभारी, कोळपेवाडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, रवंदे, रुई-शिंगवे, शिंगणापूर, सुरेगाव, वारी-कान्हेगाव, जेऊर कुंभारी, पुणतांबा, रांजणगाव देशमुख, धारणगाव तसेच पिंपळवाडी-न. पा. वाडी पाणीपुरवठा योजनेचा देखील आढावा घेतला.
अधिकार्यांना सूचना करताना ते म्हणाले की, रेंगाळलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देऊन कामे सुरू करा. कामांची गुणवत्ता वर्क ऑर्डरप्रमाणे होत असल्याची वेळच्या वेळी खात्री करा. ज्या पाणीपुरवठा योजनांच्या वर्क ऑर्डर देवून देखील अद्यापि काम सुरू झाले नाही, त्या ठेकेदारांना तातडीने नोटिसा देऊन लवकरात काम सुरू करा.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राहुल रोहमारे, अनिल कदम, श्रावण आसने, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, माजी सदस्य मधूकर टेके, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात, राजेंद्र औताडे, नंदकिशोर औताडे, गोपीनाथ रहाणे, सुनील कुहिले, लक्ष्मण थोरात, नानासाहेब नेहे, महेंद्र वक्ते, बापूसाहेब वक्ते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत कदम, शेखर मिटकरी, पंचायत समिती बांधकाम विभागाचे संतोष दळवी, बाळासाहेब साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चांगदेव लाटे, सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.
कामांचे नियोजन करा : आ. काळे
सर्व नागरिकांना नळाच्या माध्यमातून पाणी पोहोचेल, योजनेचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना नळाद्वारे कायमस्वरूपी पाणीपुरवठा होईल, अशा पद्धतीने नियोजन करून पाणी पुरवठा योजनांचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना आ. काळेंनी केल्या.