नगर जिल्ह्यात पावसाने 98 हेक्टर पिकांचे नुकसान
नगर; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 98.60 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका 237 शेतकर्यांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा शेतपिकांना तडाखा बसत आहे. बुधवारी (दि.26) झालेल्या वादळी पावसाने पाथर्डी तालुक्यातील 2 गावांतील 95 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
याचा आर्थिक फटका 230 शेतकर्यांना बसला आहे. राहुरी तालुक्यातील एका गावालादेखील अवकाळीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे सात शेतकर्यांची 3.60 हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत. कृषी विभागाने या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.