

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचा शोध घेण्यासाठी वन्यजीव उर फुटेपर्यंत सैरवैर धावत सुटतात. हेच वन्यप्रामणी नगर – पुणे महामार्गावर अपघातात बळी पडतात. वाड्या-वस्त्यांवर व गावकुसाकडे पाण्यासाठी येतात. या आशयाची सविस्तर बातमी दैनिक 'पुढारी'ने गुरुवारी (दि.13) प्रसिद्ध केली. त्या बातमीची दखल घेऊन नगर येथील सामाजिक व धर्मिक कार्य करणार्या जैन सोशल फेडरेशनने वनविभागात कोरड्या पडलेल्या पाणवठ्यात टॅकरद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर तालुक्यातील कामरगाव व पारनेर तालुक्यातील वाळवणे, रायतळे, अस्तगाव या गावांच्या शिवहद्दीवरील डोंगररांगेत हरीण, ससे, तरस, लांडगे, मोर, बिबटे आदी वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. तेथे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे शाश्वत स्त्रोत, पाणवठे नाहीत. याबबत वनविभाग कायम उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने कामरगावचे सामाजिक कार्यकर्ते सरपंच तुकाराम कातोरे यांनी स्वखर्चाने वनविभागात पाणवठे तयार केले. अनेक वर्षांपासून वन्यजीवनाची तहान भागवत आहेत.
परंतु, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असून, त्याठिकाणी जास्ती पाणवठे तयार करून वन्यजीवांची तहान भागावी, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. परंतु, वनविभाग त्याकडे डोळेझाक करत आहे. वन्यजीवांची होणारी परवड व त्यांची व्यथा दैनिक 'पुढारी'ने सविस्तर मांडली. त्यानुसार जैन सोशल फेडरेशनचे प्रकाश छल्लानी यांनी सरपंच तुकाराम कातोरे व वन्यजीव सरंक्षण समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप साठे व खजिनदार अशोक कातोरे यांच्या बरोबर संपर्क साधला. पाणवठ्यात टॅकरने पाणी सोडण्याची तयारी दर्शवली. यामुळे वन्यजीवांची तहान भागणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले आहे.
काहळच्या डोंगर पायथ्याला भैरवनाथ मंदिरात शनिवारी (दि.22) सामूहिक उपोषण करण्यात येईल.
– तुकाराम कातोरे, सरपंच, कामरगाव