नगरमधील राहुरी तालुक्यात 450 हेक्टर शेतीपिकाचे नुकसान

नगरमधील राहुरी तालुक्यात 450 हेक्टर शेतीपिकाचे  नुकसान
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यामध्ये सलग तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकर्‍यांच्या कांद्याचा वांदा झाला. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालामध्ये 450 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. दोन ठिकाणी वीज कोसळली तर पाच गावांमध्ये गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. राहुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने सलग दोन दिवस अक्षरशः धुमाकूळ घातला. सलग तासभरापेक्षा अधिक काळ कोसळणार्‍या पावसाने शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे होत्याचे नव्हते केले. कांदा, गहू पिकांहचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राहुरी तालुक्यातील ताहाराबाद, म्हैसगाव, शेरी चिखलठाण यासह ब्राम्हणी हद्दीमध्ये गारपीटीचा तडाखा बसला. राहुरी शहरासह बारागाव नांदूर, देवळाली प्रवरा, वांबोरी, गुहा, मानोरी, वळण, आरडगाव, तांदूळवाडी, चिंचविहीरे, तांभेरे, बाभूळगाव, वरवंडी, खडांबे, कनगर आदी सर्वच पट्ट्यामध्ये अवकाळीने धुमाकूळ घातला.

कोंढवड गावातील राजेंद्र दत्तात्रेय पवार यांच्या घरालगतच्या नारळाच्या झाडावर तर उंबरे येथील उत्तम पंढरीनाथ ढोकणे यांच्या घराच्या दुसर्‍या मजल्याला वीजेने स्पर्श केला. ऐन काढणीला आलेला गहू पावसाच्या पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपार पासूनच पावसाचा प्रारंभ झाला. रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यानंतर शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने सांयकाळच्या सत्रात धोधो वर्षाव केला. परिणामी पावसाळ्याप्रमाणेच सर्वत्र पाणीमय परिस्थिती निर्माण झाली होती.

तहसीलदार फसियोद्दीन शेख व तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी सांगितले की, राहुरी हद्दीत सर्वत्र अवकाळी पावसाने कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. काढणीला असलेला गहू अवकाळीच्या तडाख्यात सापडला. सुमारे 450 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 7 ते 8 गावांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.

पावसाचा निधी अजूनही प्रतिक्षेतच
मागील वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा राहुरी तालुक्यातील एकच राहुरी मंडळातील शेतकर्‍यांना निधी वाटप होत आहे. काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मागील वर्षी सततच्या पावसाच्या नुकसानीचा निधी, तसेच अवकाळी नुकसानीचा निधी शासनाने तत्काळ अदा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

आज (सोमवार) पासून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मागील महिन्यातील पावसाच्या नुकसानीची माहिती शासनापर्यंत पोहोच केली आहे. त्यानंतर पुन्हा अवकाळी बरसल्याने नुकसानीचे पंचनामे शासनापर्यंत पोहोच करू.
                                                                   – फसियोद्दीन शेख, तहसीलदार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news