व्हॉटस् अ‍ॅप स्टेटस ! वाद !! आणि हाणामारी… वारुळवाडीच्या राड्याने नगर ‘अशांत’ | पुढारी

व्हॉटस् अ‍ॅप स्टेटस ! वाद !! आणि हाणामारी... वारुळवाडीच्या राड्याने नगर ‘अशांत'

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गजराजनगर आणि वारूळवाडी परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेत सात जण जखमी झाले असून, परस्परविरोधी फिर्यादीवरून सुमारे 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर ठेवलेल्या स्टेटसवरून हा वाद सुरू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, या घटनेने शहर ‘अशांत’ झाले आहेे. पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर असून, शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल झालेल्यांची धरपकड करत 18 जणांना अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर येथे दोन गटांत मंगळवारी रात्री व्हॉटस् अ‍ॅपवर स्टेटस ठेवण्यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संतोष साहेबराव कर्डिले (रा.कोतकरमळा, वारुळवाडी) या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून रज्जाक नूर खुदा खान, अनुरुद्दीन अबुद्दीन शेख, जिशान कादीर खान व इतर 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष कर्डिले रस्त्यात जमाव पाहून थांबले व तेथे उभ्या असलेल्या रोहन नंदू धोत्रे याला काय, झाले असे विचारले. त्यानंतर तेथे असलेल्या जमावाने संतोष कर्डिलेला मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवरून येत असलेल्या दीपक बाणखेले, किरण मांजरे या दोघांनाही मारहाण केल्याचे

फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनतर जमावाने कर्डिलेंची चारचाकी वाहनाची तोडफोड करत दुचाकी पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर दुसर्‍या गटाने तिघांना मारहाण केली. याबाबत रज्जक नूर खुदा खान (रा.गजराजनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा जणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रज्जक नूर खुदा खान व अमरुद्दीन शेख हे गजराजनगरकडे जाताना सहा जणांनी लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे
जिशान कादीर खान, अमरूद्दीन अबुद्दीन शेख, अब्दुल कादीर उमरखान, आरिफनूरूल खुदा खान, गुलाब महम्मद खान, वसीद इरफान अलीखान, अब्दुल कय्युम हबीबखान, सर्फराज मोहम्मद सय्यद, अब्दुल मलिक मोहम्मद खान, असगर अली बैतुल्ला खान, मैनुद्दीन अय्युब अन्सारी, मोहम्मद जमाल खान, हसतमुल्ला अब्दुल मलिक खान, कुतूबुद्दीन अब्दुल जब्बर खान, युसूफ अली जैनुद्दीन शेख, अतुल साहेबराव कर्डिले, किरण दत्तात्रय मांजरे व इतर चार अनोळखी.

शांतता समितीची बैठक
दोन गटांत झालेल्या जाळपोळ आणि हाणामारीच्या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बुधवारी (दि.5) शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, पोलिस अधीक्षक ओला यांच्यासह शांतता समितीतील सदस्य उपस्थित होते.

Back to top button