कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना निर्देश देत धोरण आखून 10 हजार कोटी रुपये आयकर माफ केला, ही बाब स्वागतार्ह आहे. साखर धंद्याला आणखी बळकटी येण्यासाठी केंद्र शासनाने साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मितीला जास्त आर्थिक सहाय्य करावे, जेणेकरून देशात कच्च्या तेलाची आयात थांबवून परकीय चलनात मोठ्या प्रमाणात बचत होईल, अशी अपेक्षा संजीवनी उद्योग समुहाने अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी व्यक्त केली.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालिका सोनिया व बाळासाहेब पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधीवत पूजेने झाली. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले.
ते म्हणाले, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेवुन सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमतेत आधुनिकीकरणासह संगणकीकरणास प्राधान्य दिले. आर्थिक शिस्त व गतीमान प्रशासकीय कामकाज, शिस्त, विना अपघात कारखाना कामकाज, उस उत्पादक शेतकर्यांसह कामगारांचे हित, सर्व संगणकीकरण कामकाज या पंचसुत्रीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे ते म्हणाले.
उपाध्यक्ष रमेश घोडेराव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, एचआर मॅनेजर प्रदीप गुरव, सचिव विधीज्ज्ञ तुळशीराम कानवडे यांनी स्वागत केले. बिपीनराव कोल्हे म्हणाले, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सभासद शेतकर्यांप्रती एकरी उसासह सर्व पिकांच्या उत्पादन वाढीस धडक कृती कार्यक्रम हाती घेत कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ केली.
तंत्रशुध्द मार्गदर्शनाने ऊस लागवड करून उपग्रहाद्वारे उतारा, तोडणी कार्यक्रमास संगणकीय 'थ्री डब्ल्यू डी' तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारा देशातील एकमेव शंकरराव कोल्हे साखर कारखाना आहे. कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्यांचे उसाचे उत्पादन वाढावे यासाठी कारखान्याने प्रती एकरी उस व साखरेचे उत्पादन देणार्या ऊस जातींचे सुमारे 6 कोटी रुपयांचे ऊस बेणे सभासद शेतकर्यांना निःशुल्क पुरविले, असे कोल्हे म्हणाले.
बिबट्यासह हिंस्र प्राण्यांचा प्रार्दुभाव वाढल्याने शेतकर्यांच्या सुरक्षीततेसाठी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने केंद्र व राज्य शासनाच्या परवानग्या घेवुन राज्यात सर्वप्रथम ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पिकावर किटकनाशक फवारणी कार्यक्रम माफक दरात शेतकर्यांच्या बांधापर्यंत उपलब्ध करून दिला, त्याचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर साखर कारखानदारीच्या यशासाठी आधुनिकीकरणाची कास धरली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल सुरू आहे. केंद्र शासनाने यापुर्वी परकीय चलनासाठी साखर निर्यातीवर विविध अनुदान देत धोरण अवलंबविले होते. कच्च्या तेलाच्या आयातीवर भारत सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागते, ती थांबविण्यासाठी साखर उद्योगामार्फत इथेनॉल निर्मितीस जास्त आर्थिक सहाय्य केंद्राने देवुन याबाबत निश्चित धोरण ठरवित तातडीने पाऊल उचलावे. साखर निर्यात कमी करून कारखान्यांना साखरेऐवजी इथेनॉल निर्मीतीसाठी प्राधान्य द्यावे. देशांतर्गत जेवढा खप आहे तेवढीच साखर निर्मिती करावी, असे ते म्हणाले.
यावेळी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनराव कोल्हे, ज्येष्ठ नेते कृषीरत्न दत्तात्रय कोल्हे, संचालक, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, मच्छिंद्र केकाण, सुनील देवकर, अंबादास देवकर, बाजीराव मांजरे, संभाजीराव गावंड, अरूणराव येवले, शरद थोरात, दगुराव चौधरी, साहेबराव रोहोम, रिपाईं नेते दिपक गायकवाड, जयराम गडाख, कामगार नेते मनोहर शिंदे यांच्यासह ऊस उत्पादक सभासद शेतकरी उपस्थित होते. उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.
कोल्हे कारखाना ऊस मळ्यात 6 हजार विकसित जाती
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी पाण्यात दर्जेदार बेण्यातून उसाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला. तोच आदर्श ठेवून कोल्हे कारखान्यांच्या ऊस बेणे मळ्यात 6 हजार विकसित ऊस जाती आहेत. त्यांचा देश- विदेशात प्रसार सुरू असल्याचे बिपीनराव कोल्हे यांनी सांगितले.