नाऊर-उंदिरगाव रस्त्यावर मुरूम ऐवजी माती | पुढारी

नाऊर-उंदिरगाव रस्त्यावर मुरूम ऐवजी माती

नाऊर; पुढारी वृत्तसेवा : पूर्वीचा राजमार्ग 47 व नव्याने राज्यमार्ग 51 या रस्त्यांचे काम काही महिन्यापूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. लहु कानडे यांच्या पाठपुराव्यातून हरेगाव फाटा ते उंदिरगाव या 10 कि.मी. रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यापुढील उंदिरगाव – नाऊर या 4 कि.मी. रस्ताचे काम नुकतेच सरू करण्यात आले आहे. या रस्त्यावर मुरुमाऐवजी चक्क माती मिश्रीत मुरुम टाकला जात आहे. संबधित विभागाच्या अधिकारी यांची डोळेझाक होत असल्याने या रस्त्याचे पुढील भविष्य अंधकारमय असुन या रस्त्याची क्वालिटी कंट्रोल कडून चौकशी करण्याची मागणी रामपूरचे माजी सरपंच सुरेश भडांगे यांनी केली आहे.

नगर व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांना जवळून जोडण्याच्या व श्रीरामपूर – वैजापूर या दोन्ही तालुक्यांची बाजारपेठेसह रस्त्यावरील ग्रामीण भाग विकसित होण्याच्या दृष्टीने आणि नगर – छ. संभाजीनगर रस्त्यावरील प्रवरासंगमच्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी करण्याच्या उदात्त हेतुने निर्माण करण्यात आलेल्या नगर – शिऊर या राज्यमार्ग 51 ची निर्मिती करण्यात आली.

भूसंपादनाच्या कायदेशीर प्रक्रियेमुळे तसेच शेतकर्‍यांना मोबदला न मिळाल्याने कोट्यवधीचा पूल होऊन देखील हा रस्ता अनेक वर्ष होऊ शकला नाही. मात्र पाठपुराव्यामुळे काही अधिकारी तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम करण्यात आले. त्यापुढील काळात या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली.

श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत नुकतेच चार किलोमीटर कामासाठी शासनाच्या तिजोरीतून साडेपाच कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून या रस्त्यावर मुरमाऐवजी चक्क माती मिश्रित मुरूम टाकला जात असून गवळा खडीचा देखील वापर करण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी डोळे झाक करत असल्याची चर्चा आहे.

निकृष्ट काम केल्यास रस्ता टिकणार कसा?
वैजापूर तालुक्यातून श्रीरामपूर तसेच राहाता बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचा शेतमाल येत असतो तसेच याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रेलचेल सुरू असून या रस्त्यावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असते. राजमार्ग असलेल्या या रस्त्याचे काम अशा ठेकेदारी पद्धतीने केल्यास हा रस्ता टिकणार का ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Back to top button