पाथर्डी परीक्षा केंद्रावर हल्ला; कडक कायदा करण्यात यावा
पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : टाकळीमानूर येथील जय भवानी परीक्षा केंद्रावर बुधवारी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात आवाज उठविला. असे प्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे पाथर्डीतील कॉपी पॅटर्न पुन्हा एकदा राज्य पातळीवर गाजला आहे.
दहावीच्या परीक्षेत कॉपीविरोधी पथकावर दगडफेकीची घटना घडली. यात एकजण जखमी झाला. गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे व त्यांच्या पथकाला शिवीगाळ व दमदाटी झाली. पोलिस ठाण्यात तक्रारदार व गटविकास अधिकारी गेल्यानंतर काही मंडळींनी मध्यस्थी करून हा वाद मिटविण्यात आला.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या सूचनेनंतर पंचायत समिती प्रशासन पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र फिर्याद का होऊ शकली नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. गुरुवारी सकाळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पालवे यांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी, असे पत्र पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिले आहे.