अकोले पुढारी वृत्तसेवा: मैत्रिणींची संगत, कुमार वयातील प्रेम आणि 'प्रेमात सगळं माफ असतं' या कारणांमुळे अकोले तालुक्यात प्रेमवीरांचा सध्या पळून जाऊन लग्न करण्याच्या घटना घडत आहेत. राजूर व अकोले तालुक्यात दिड महिन्यात १० तरुणी आणि अल्पवयीन मुली १० पळून गेल्याची नोंद पोलिस डायरीत झाली आहे. पोलिसांना यामधील केवळ ५ मुलींचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. परिणामी अकोले, राजूर परिसरात सध्या 'सैराट झालं जी' असे वातावरण आहे. यामुळे मुले आणि पालकांमध्ये सुसंवाद होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या अकोले तालुक्यात राजूर व अकोले या दोन पोलिस स्टेशनवर सुमारे २ लाख ९१ हजार ९५० लोकांच्या रक्षणाची जबाबदारी आहेत. दरम्यान मुला मुलीच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल आल्याने सोशल मीडियाच्या छंदातून प्रेमविवाहाचे दिवसागणिक प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अकोले तालुक्यात राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून सन २०२२ या वर्ष अखेर अल्पवयीन मुली, तरुणी, विवाहित महिला अशा एकूण ३२ जणी घरातून निघून( बेपत्ता) गेल्या आहेत. त्यापैकी पैकी २८ तरुणीचा शोध पोलिसांनी लावल्याचे पोलिस ठाण्यातील नोंदीवरुन दिसुन येते. तसेच अकोले पोलिस स्टेशनच्या हद्दीतून २०२२ अखेर २३ जणी घरातून निघून(बेपत्ता) झाल्या. त्यापैकी की १५ तरुणीचा शोध पोलिसांनी लावला आहे. यामधील जवळपास ८० टक्के मुलींनी प्रेमविवाह करून आपले संसार थाटले आहे. तर नोंद नसलेल्यांची संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे. १८ वर्षांखालील मुलगी हरवल्यानंतर मुलगा, मुलगी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध घेतला जातो.
पालकांनी आपल्या पाल्यांसोबत सुसंवाद साधून मोबाईलच्या अतिरेकी वापराकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यांचे वाचन,आवडते छंद, कला कशी जोपासता येईल याचा शोध घेऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. मन, मेंदू , मनगट यांच्या मदतीने जीवनकौशल्य आत्मसात करण्याकडे मुलांचा कल वाढविला पाहिजे. आपल्या मुलांचे मित्र- मैत्रिणी कोण, संपर्कात येणारे लोक कोण आहेत? याकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. पालक आणि मुले यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण ताणविरहित नाते असेल तर मुलं पालकांसोबत आपल्या समस्यांविषयी मोकळेपणाने बोलू शकतात. परंतु, मोबाइलच्या अतिवापरामुळे हा सुसंवाद कमी झाल्याचे चित्र समाजात बघायला मिळत आहे.
– प्रतिमा कुलकर्णी, साऊ एकल महिला समिती, अकोले