वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जखणगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक जालिंदर सुदाम नरवडे हे गावगुंडांकडून होत असलेल्या त्रासामुळे भयग्रस्त झाले आहेत. याबाबत त्यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनाच निवेदन देऊन मदतीची याचना केली आहे. जखणगाव येथे हा प्रकार घडला आहे. दैनंदिन परिपाठाने शाळेची सुरुवात होते व त्यात शेवटी पसायदानाने परिपाठाची सांगता केली जाते. मात्र, काही विद्यार्थी पसायदान म्हणत नाहीत.
याबाबत त्या विद्यार्थ्यांना विचारणा केली असता, गावातील काही समाजकंटकांकडून आमच्या धर्मात पसायदान म्हणत नाहीत आणि तुम्ही विद्यार्थ्यांना पसायदान म्हणायला लावू नका, तसेच आषाढी एकादशी व गोकुळाष्टमीला दहिहंडीचा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा करू नका, अशी दमबाजी केली जात आहे. यातून अनेकवेळा मानसिक त्रासही दिला जात आहे. समाजकंटकांनी आपल्या गाडीची तोडफोड करून जीवघेणा हल्ला सुद्धा केला आहे. त्यामुळे आपले कुटुंब भयभीत झाले असून, या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी नरवडे यांनी या निवेदनात केली आहे.