बजेटमुळे मिळाला नगरच्या हायवेला स्पीड ! | पुढारी

बजेटमुळे मिळाला नगरच्या हायवेला स्पीड !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमधून नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना ‘वेग’ मिळून ते पूर्णत्वास जाणार आहेत. सुरत-चेन्नई, तसेच पुणे- औरंगाबाद या महामार्गांच्या कामांना गती देतानाच, नगर-मनमाड हा 75 कि.मी. कामासाठी 750 कोटींची तरतूद बजेटमध्ये असेल असा विश्वास जिल्ह्यातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला. त्यामुळे बजेटचे नगरकरांमधून स्वागत केले जात आहे.  देशाच्या अर्थसंकल्पात दळण-वळण, कृषी विकास, औद्योगीक विकास, महिला सक्षमीकरण, सहकार यासह अन्य क्षेत्रात काही बदल घडविणार्‍या भरीव तरतुदी आहेत. यात ‘हायवे’ला मोठी मदत मिळाल्याचे दिसते आहे. नगर जिल्ह्यातील जे प्रस्तावित हायवे आहेत, ते बजेटमध्ये समाविष्ट आहेत. यातील सुरत-चेन्नई हा 1300 किलोमीटरचा 50 हजार कोटींचा प्रोजेक्ट आहे.

नगर जिल्ह्यातून 180 किलोमीटरचा हायवे जाणार आहे. यावर्षीच्या बजेटमधून या कामासाठी निधीची तरतूद होणार आहे. त्यामुळे या कामाला लवकरच गती येईल. तसेच पुणे-औरंगाबाद हा महामार्गही मंजूर आहे. या मार्गाची 270 किलोमीटर लांबी आहे. साधारणतः पाच हजार कोटींची हा प्रकल्प आहे. या बजेटनंतर पंधरा दिवसात कामाची प्रक्रिया सुरू होणार आहे. याशिवाय दैनंदिन प्रवासी तसेच साई-शनिभक्तांसाठी महत्वपूर्ण समजला जाणारा नगर-मनमाड या 75 किलोमीटर महामार्गालाही मंजूरी मिळालेली आहे. या बजेटमधून या कामासाठी 750 कोटींचा निधी मिळणार असल्याने हे कामही लवकरच सुरू होणार आहे. जिल्ह्यात अन्य काही कामे 50 टक्के पूर्ण झालेली आहेत. त्यांनाही बजेटमधून निधी मिळू शकणार आहे.

दरम्यान, बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी कमीत कमी 20 टक्के तरतूद हवी होती. मात्र केवळ 6 टक्के तरतूद झाल्याने काहीशी नाराजी आहे. तरीही कृषी उत्पादकता वाढवण्यासाठीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचवण्यासाठी बजेट केले आहे. यात ड्रोन तंत्रज्ञानावर भर दिला आहे. याचा फवारणीसाठी वापर होऊन खर्च कमी होईल.  कृषीतील छुपी बेरोजगारी कमी करण्यासाठी खासगी आणि सरकारी गुंतवणूक करून अ‍ॅग्रीकल्चर स्टार्टअप बीझनेस सुरू केला जाणार आहे. यंदाचे हे भरडधान्य वर्ष आहे. त्यामुळे बाजरी, नाचणी, ज्वारी या पिकांना प्राधान्य देवून उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. महिला सक्षमीकरणातूनही जिल्ह्यातील 23 हजार बचत गटांचे सबलीकरण होणार आहे. रेल्वे मार्गाबाबतही भरीव तरतूद
असल्याचे पुढे येत आहे.

Back to top button