म्हाळूंगी नदीवरील पूल होणार लवकरच ; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

म्हाळूंगी नदीवरील पूल होणार लवकरच ; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली असून हे शहर विकासाचे मॉडेल ठरले आहे. यावर्षीच्या जास्त पावसामुळे पुलाच्या पायाच्या स्लॅबचा राफ्ट तुटल्यामुळे नदीवरील पूल खचला आहे. या पुलाच्या नवीन उभारणीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या माध्यमातून लवकरच नविन पूल उभारला जाणार असल्याची माहिती व काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दिली आहे. आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत.

मोठमोठ्या वैभवशाली इमारतींसह हायटेक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट्य ठरत आहे. संगमनेर शहरात थेट निळवंडे पाईपलाईन योजनेद्वारे नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळत असून रस्ते, भूुमगत गटारे अशा पायाभूत सुविधा राबवल्या गेल्या आहेत.  नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ व हरित संगमनेर ठरलेल्या या शहराला नुकताच देश पातळीवरील पुरस्कार मिळाला असून दहा कोटींचे बक्षीसही मिळाले आहे.

मागील वर्षी सततच्या पावसाने म्हाळूंगी नदीवरील पूल खचला असून हा पूल साईबाबा मंदिर, गंगामाई घाट, साईनगर, पंपिंग स्टेशन या उपनगरातील रहिवासी व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच गंगामाई परिसरात फिरण्यासाठी नागरिक या पुलावरूनच ये – जा करत असतात. म्हणून हा पूल तातडीने होण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
आमदार थोरात यांच्या मागणीला मान देऊन हा निधी नगर विकास विभागाकडून तातडीने मिळणार असून या निधीतून या नवीन पुलाचे काम लवकरात लवकर होणार असल्याचेही निखिल पापडेजा यांनी सांगितले आहे. या नवीन पुलामुळे या परिसरातील नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news