

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ल्यानंतर गावचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या मारहाण प्रकरणात खुनाचा प्रयत्नासह अॅट्रोसिटी कायदा अंतर्गत तब्बल 34 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान इघे यांच्यावर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
अशातच गुरूवार दि. 5 जानेवारी रोजी रात्री 2 वाजेच्या दरम्यान साकूर येथील महिलेच्या फिर्यादीनुसार एकूण 7 जणांसह इतर 10 जणांवर अॅट्रोसिटी कायदासह विनयभंगा सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद घारगाव पोलिस स्टेशनला झाली आहे. अशा गुन्ह्याच्या मालिकेने आदर्श साकूर गावाला गालबोट लागले आहे.
गावात सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन गटात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पोलिस प्रशासन संभ्रमात पडले आहे. साकूर गावाचे प्रमुख शंकर खेमनर व इंद्रजित खेमनर यांचे समर्थनार्थ संगमनेर येथे गेल्याचे कारणावरून बुधवारी (दि. 4) जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान सुभाष बाजीराव खेमनर, बुवाजी भागा खेमनर, किशोर बाजीराव खेमनर, इसाक अब्दुल पटेल, विश्वजित सुभाष खेमनर, बबलू उर्फ आदिक बाळासाहेब शेंडगे, सद्दाम मन्सूर चौगुले (सर्व रा. साकूर) तर इतर 9 ते 10 जणांनी गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सचिन सोनवणे यांच्या आंबेडकर नगरमधील राहत्या घरावर जात गैर कायद्याची मंडळी जमवून अनाधिकृत घरात घुसत जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत दोघांसह इतर नातेवाईकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यांना घरातून बाहेर ओढून आणत पुन्हा त्यांचे मागे दिसले तर तुमची वस्ती जाळून टाकू व संपूर्ण जात नष्ट करून टाकण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या दरम्यान सुसंस्कृत तालुक्यातील आदर्श साकुरगाव दहशतीच्या छायेखाली आले असून नागरिक भयभीत झाले आहे. एका पाठोपाठ एक गुन्ह्याच्या मालिकेने गाव सैरभैर झाले आहे. या गुन्ह्याच्या मालिकेने सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गटात तणाव निर्माण झाला असून गावचे वातावरण ढवळून निघाले आहे. गावात शांतता भंग झाल्याने येथील नागरिक असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहे. या दहशतीच्या व अशांततेच्या वातावरणात एखाद्याचा हाकनाक बळी जाण्याची शक्यता येथील जाणकार व्यक्ती व्यक्त करत आहे.
घारगाव पोलिसांनी तत्परता दाखवत सुनील इघे यांचे प्राण वाचवले. यानंतर एका पाठोपाठ एक गंभीर गुन्हे दाखल होत गेले आहे. घारगाव पोलिस स्टेशनचे पो. नि. सुनील पाटील व कर्मचारी आपली कामगिरी निःपक्षपणे बजावत आहे. तर डीवायएसपी संजय सातव या गुन्ह्यांचा तपास पारदर्शक करत आहे. तरी देखील पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर ताशेरे ओढले जात असल्याने पोलिस प्रशासन संभ्रमात पडले असल्याची चर्चा नागरिक करत आहे.
साकूर गावातील गुन्ह्याच्या मालिकेने सत्ताधारी आणि विरोधक यांचेत तणाव निर्माण झाला आहे. एका पाठोपाठ एक असे गंभीर गुन्हे दाखल होत असल्याने गावाचे वातावरण वेगळ्याच दिशेने वाटचाल करत आहे. गावात अघटीत प्रकार घडण्याआधी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी व जिल्हाधिकारी यांनी आता गावात लक्ष घालून शांतीदूताची भूमिका बजावत गावची शांतता अबाधित ठेवण्याच काम करत नागरिकांना सुरक्षित करण्याचं काम करणे गरजेचे आहे.