

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना धर्मवीर अशी उपमा इतिहासकरांनी दिली आहे. मात्र, विरोधी पक्ष नेते अजित पवार महाविकास आघाडी सरकारचे पाप झाकण्यासाठी संभाजी महाराज धर्मवीर नसल्याचा जावाई शोध लावला. याचा आम्ही निषेध करतो. पवारांनी माफी मागावी, असा इशारा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिला.
पेडगाव येथे बहादूर गडावर जाऊन छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्तंभास खासदार विखे, आमदार बबनराव पाचपुते व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. पेडगाव ते श्रीगोंदा रॅली काढून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेतली. नंतर पत्रकारांशी विखे यांनी संवाद साधला.
विखे म्हणाले, ज्या मोगलांनी हिंदू धर्मातील देवस्थानांची विटंबना केली, महिलांवर अत्याचार केले. त्या मोगलाच्या कबरी नूतनीकरण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने निधी दिला. नगर जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी माझा सुरुवातीपासून विरोध आहे. नामांतराचा विषय ऐरणीवर आला आहे, हा निर्णय जिल्ह्यातील जनतेच्या भावना विचारुन घेऊन करावा, अशी माझी भूमिका आहे, असे खासदार विखे म्हणाले. श्रीगोंदा तालुक्यातील अपूर्ण कामे पूर्ण अथवा नवीन कामे सुरू करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत सपाटा लावणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रतापसिंह पाचपुते, बाळासाहेब महाडिक, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब गिरमकर, सचिन कातोरे, बापू गोरे, ज्ञानेश्वर विखे, अशोक खेंडके लक्ष्मण नलगे आदी उपस्थित होते.
नगर-दौंड रस्त्यावर लोणी व्यंकनाथ शिवारातील उड्डाणपूल व रस्ता डांबरीकरणाचे काम पंधरा दिवसांत सुरू झाले नाही, तर मी स्वतः श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहे, असा इशारा खासदार विखे यांनी देत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांच्या हलगर्जीपणावर नाराजीचे आसूड ओढले.