बाहेरच्या लोकांनी नगरमध्ये येऊन नाव बदलण्याची भूमिका मांडणं चुकीचं: राधाकृष्ण विखे पाटील
पुणे, पुढारी ऑनलाईन: जिल्ह्याबाहेरील लोकांनी नगरमध्ये येऊन नाव बदलण्याची भूमिका मांडणं चुकीचं आहे, असं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. तसेच पडळकर माझे चांगले मित्र आहेत आणि या विषयावरती आम्ही बोलणार आहोत, असे देखील त्यांनी यावेळेस सांगितले. नामांतराचा मुद्दा बाहेर काढण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. नामांतराची जी चर्चा सुरू आहे, ती विनाकारण आहे. हे थांबवलं पाहिजे आणि जिल्ह्याबाहेरच्या लोकांनी या गोष्टींमध्ये लुडबुड करू नये, असं विखे पाटील म्हणाले.
कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी त्यांच्या आणि मुक्ता टिळक यांच्या सभागृहातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री विखे यांनी अहमदनगरच्या नामातंराच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं.