चंदनापुरीच्या शेतकर्‍याने सोडल्या टोमॅटोत मेंढ्या! | पुढारी

चंदनापुरीच्या शेतकर्‍याने सोडल्या टोमॅटोत मेंढ्या!

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : टोमॅटोला भावच मिळत नसल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील चंदनापुरी येथील एका शेतकर्‍याने टोमॅटोच्या शेतात चक्क शेळ्या, मेंढ्या सोडल्या. शेतकर्‍यांचे सोयरसुतक ना शासनाला न व्यापार्‍यांना, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. टोमॅटो शेतमालाला भाव मिळत नसल्याने उत्पादक बळीराजा नाराज असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन होत आहे, मात्र भाव नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

टोमॅटो विक्रीतून खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकर्‍याला एकरीसाधारणतः 20 हजार ते लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, मात्र बाजारात टोमॅटो विक्रीला गेले असता 50 अन् 100 रुपये जाळी जात असेल तर त्या शेतकर्‍याने करायचे तरी काय, असाही प्रश्न आता टोमॅटो उत्पा दक शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. बाजारात बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्रीस नेला असता येणार्‍या पैशातून त्याचा विक्री खर्च सुद्धा भागत नसेल तर टोमॅटो लावून उपयुक्त तरी काय, असाही प्रश्न आता शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे.

मेंढ्यांनी खाल्ले तर काय बिघडले…?
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील शेतकरी शशिकांत विठ्ठल कढणे यांच्या टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव मिळाला. विक्री खर्चही न निघाल्यामुळे हतबल झालेल्या कढणे यांनी शेतात पिकलेला टोमॅटो विक्रीस न नेता घरीच शेळ्या, मेंढ्यांनी खाल्ले तर काय बिघडले, ठरवत टोमॅटोच्या शेतामध्ये शेळ्या, मेंढ्या सोडल्याचे विदारक चित्र दिसले.

टोमॅटो रोप, शेतीची मशागत, मल्चिंग पेपर, ठिबक, खते, औषधे, मजुरी, मंडप बांधण्यासाठी (बांधणी) लागणारी तार, बांबू, सुतळी आणि टोमॅटो काढणी अशा एकूण खर्चाचा विचार केला असता तो एकरी साधारणतः 50 हजार ते लाख रुपयांपर्यंत येतो. एवढा खर्च होऊनही सध्या बाजारामध्ये टोमॅटोचा खर्च वजा जाता काहीच शिल्लक न राहता कोर्‍या पावत्या मिळतात.
                                                                -शशिकांत कढणे, शेतकरी,

 

Back to top button